सोळा किनार्यांवर 896 घरट्यांचे जतन
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
जिल्ह्याच्या समुद्र किनार्यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचे संवर्धनही केले जाते. यंदा जिल्ह्यात एकूण 16 किनार्यांवर 896 घरट्यांचे संवर्धन करण्यात वन विभाग, कासव मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. त्या घरट्यांमध्ये 88 हजार 312 अंडी होती. त्यातील 48 हजार 192 कासवांना समुद्रात सोडण्यात आले. यंदा उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे काही अंशी त्याचा परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यंदा जिल्ह्यातील आंजर्ले, केळशी, कर्दे, मुरूड, दाभोळ, कोळथरे, लाडघर, वेळास, गुहागर, गुहागर वरचा पाठ, तवसाळ, गावखडी, माडबन, व्येत्ये, मालगुंड, भाट्ये बीच या सोळा किनार्यांवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी आली होती. त्याची नोंद वनविभागाकडे झाली आहे.
पूर्वी कासवे किनार्यावर अंडी घालून गेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ अंडी शोधून ती खाण्यासाठी वापरत किंवा कोल्हे, कुत्रे ही अंडी फस्त करीत. परंतु, वनविभागाकडून कासवसंवर्धन मोहीम राबवण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक कासव मित्र पुढे आले. त्यामुळे कासव बचाव मोहीमेला वेग आला. अगदी मच्छीमारांच्या जाळ्यात आलेली कासवेही पुन्हा समुद्रात सोडण्यात येऊ लागली आहेत. त्याचे फायदे दिसू लागले असून यावर्षी अंडी घालण्यासाठी येणार्या कासवांची संख्या वाढली आहे.