| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या असताना त्याच जमिनीवर उभारलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना रोजगारापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
खालापूर तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या गोदरेज कंपनीत स्थानिकांना नोकरी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीत ठराव करण्यात आला होता. मात्र, स्थानिक तरुणांना रोजगार न देता बाहेरील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप घारे यांनी केला. कंत्राटी पद्धतीमुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी उद्योगांसाठी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार आणि कामाचे ठेके मिळणे अपेक्षित आहे. मात्र, स्थानिकांना डावलले जात असल्याने तरुणांमध्ये नाराजी आहे. या प्रश्नावर प्रशासनाने तसेच संबंधित उद्योगांनी ठोस भूमिका घेऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी घारे यांनी केली. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा घारे यांनी दिला आहे.






