पोलीस, नागरिकांच्या सतर्कतेमुळे बचावला जीव
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे व जागरुक नागरिकांमुळे सोमवारी सायंकाळी रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह तिच्या एक वर्षीय मुलाचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
पती-पत्नीच्या सातत्याने होणार्या भांडणामुळे सदर महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले होते. नेहमीप्रमाणे आजही सदर महिलेचे आपल्या पतीबरोबर कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून तिने पोलिसांशी संपर्क साधला. तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विवेकानंद शिरसाट, पो.शि. तुकाराम गोडे हे उसर्ली येथे गेले व त्यांनी या दोघांची समजूत काढली. तसेच, त्यांना पळस्पे पोलीस चौकीत आणून समुपदेशन केले. तरी पण आज संध्याकाळी या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाल्याने सदर महिलेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस तिच्या घरी गेले असता ती घरात आढळून आली नाही. ती आपल्या एक वर्षीय मुलासह कुठेतरी निघून गेल्याचे त्यांना समजले.
त्यानुसार या दोन्ही पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांच्या मदतीला उसर्ली गावातील चेतना म्हात्रे, जयश्री म्हात्रे, संदेश म्हात्रे, विकास मिसाळ, अर्पेश म्हात्रे आदी होते. सदर महिलेचा शोध घेत असताना ती पनवेल बाजूकडे जाणार्या रेल्वे रुळावर आपल्या लहान मुलासह झोपलेली आढळली. दरम्यान, त्याच वेळेस एक रेल्वे या रुळावर धावत होते. यावेळी सर्वांनी तेथे धाव घेऊन ते रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे थांबेपर्यंत या महिलेच्या शरीरावर 4 ते 5 डबे पुढे गेले होते. अखेरीस त्या महिलेला सर्वांच्या मदतीने रेल्वे रुळावरुन बाहेर काढण्यात आले व पुन्हा त्यांना पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांमधील वाद मिटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल चौघुले तसेच, विवेकानंद शिरसाट व तुकाराम गोडे यांनी विशेष प्रयत्न केले. याबाबत पनवेल शहर पोलीस सदर महिलेला पूर्ण मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.