उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; निवडणूक आयोगाकडे केली मागणी
| मुंबई | प्रतिनिधी |
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे राजकारण बदलून गेले आहे. खासदार असलेल्या सुनेत्रा पावर राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी आली आहे. सोबतच सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. असे असतानाच आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या या पत्रात निवडणूक आयोगाला एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 28 जानेवारी 2026 रोजीनंतर पक्षाने केलेला कुठलाही पत्रव्यवहार वैध मानू नये, अशी विनंती सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे हे पत्र म्हणजे खा. सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धक्का तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजीच विमान अपघात झाला होता. म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने आतापर्यंत केलेला कोणताही पत्रव्यवहार अवैध मानावा, अशी विनंतीच सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु ही चर्चा हवेतच विरली. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर आता सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले हे पत्र समोर आले आहे. त्यामुळेच हे पत्र म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना धक्का तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कार्यकारी अध्यक्षांना सर्वाधिकार देणारे पत्र कोणाचे ?
अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. यानंतर अवघ्या 18 व्या दिवशी अर्थात 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. या पत्रामध्ये पक्षाच्या संविधानात बदल केला असल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. या तिघांनी दिलेल्या पत्रात, पक्षाचे सर्वाधिकार हे कार्याध्यक्षांना देण्याची मागणी करण्यात आली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना या पत्राची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आणि त्यात म्हटले की, अजित पवार यांचा अपघात 28 जानेवारी 2026 ते सुनेत्रा पवार अध्यक्ष होईपर्यंत जो पत्र व्यवहार निवडणूक आयोगाला केला गेला तो ग्राह्य धरु नये.
सुनेत्रा पवारांनी आयोगाला काय सांगितले?
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाकडून 16 फेब्रुवारीला एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्या पत्रावर प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत. पक्षाची घटना बदलली आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे (कार्यकारी अध्यक्ष) पक्षाची ताकद असेल. ते सर्व निर्णय घेतील, असे या पत्रात म्हटले होते. नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट कोण होते, असा सवाल करत रोहित पवार यांनीच त्याचे उत्तर देत प्रफुल पटेल यांचे नाव घेतले. वर्किंग प्रेसिडेन्ट यांच्याकडे सर्वाधिकार घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र जेव्हा सुनेत्रा पवारांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार विचारात घेऊ नये, अशी विनंती केली असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
