मार्गदर्शक नियमावलीस विलंब
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्यास विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. मार्गदर्शक नियमावली बनवेपर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरुन जाईल, असे परखड मतही न्यायमूती एम.आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. जेव्हा तुम्ही पुढची पावले उचलाल, तेव्हा तिसरी लाट संपलेली असेल. मृत्यू प्रमाणपत्र आणि याबाबतचा आदेश यापूर्वीच पास झाला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत चार आठवड्यात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची सूचना दिली होती. आता या आदेशाला दोन आठवडे उलटून गेले आहेत. आज कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावरील मार्गदर्शक नियमावलीबाबत प्रतिज्ञापत्र मागितलं होतं. मात्र, केंद्र सरकारच्या वकिलांनी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. आता 11 सप्टेंबरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 30 जूनला दिलेल्या न्यायिक आदेशांचं पालन करण्यास सांगितलं आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 11 सप्टेंबर किंवा त्याआधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
चार लाख भरपाईची तरतूद
केंद्र सरकारने कोरोना अधिसूचित आपत्ती घोषित केली आहे. केंद्र सरकारने अधिनियम 12(3) नुसार 8 एप्रिल, 2015 ला एक आदेश जारी केला होता. यामध्ये आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. ही मदत राज्य किंवा राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया कोषातून दिली जाते. मात्र, कोरोनाबाबच्या मृत्यूबाबत भरपाई निश्चित केलेली नाही. मार्गदर्शन नियमावली बनवताना सहा आठवड्यांच्या आत रक्कम निश्चित करावी, असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सांगितलं होतं.
सर्वाधिक रुग्णसंख्या
गेल्या 24 तासांत 47,092 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
चार राज्यांची स्थिती धोक्याची
एकट्या केरळमध्ये एक लाख रुग्ण बाधित आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या दहा हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे. यामध्ये डेल्टाचे अधिक रुग्ण अधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.