व्हीप झुगारणे आले अंगाशी
शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस
| मुंबई | प्रतिनिधी |
बंडखोरी करणार्या 16 आमदारांना अपात्र ठरविले जावे, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (11 जुलै) सुनावणी होणार असून, या सुनावणीवर राज्यातील शिंदे सरकारचे आणि शिवसेनेेचे भवितव्य ठरणार आहे. यामुळे याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 39 आमदारांनी बंड करु ठाकरे सरकार पाडले होेते. त्याविरोधात शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू यानी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन 16 आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.
53 आमदाराना नोटिसा
विधिमंडळ सचिवांनी शिवसेनेच्या 53 आमदारांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या 53 आमदारांमध्ये शिंदे गटातील 39 आणि उद्धव ठाकरेंसोबत असणार्या 14 आमदारांचा समावेश आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये आदित्य ठाकरेंचा उल्लेख नाही. दरम्यान,आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुरु असलेल्या याचिकेवर सोमवारी (11 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निर्णयावर सरकारचे आणि शिवसेनेच भवितव्य अवलंबून आहे. राज्यपालांच्या निर्देशानुसार, 3 जुलैला विधानसभा अध्यक्ष निवडणूक पार पडली, तर 4 जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यावेळी शिंदे गटाने भाजपाच्या बाजूने तर उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं. यानंतर दोन्ही गटांकडून व्हिपचं उल्लंघन केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. सर्व आमदारांना सात दिवसांत विधिमंडळात उत्तर द्यावं लागणार आहे.
आदित्य ठाकरेंना नोटीस नाही
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी 14 आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली होती. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं होतं. भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही, असं सांगितलं होतं.
ज्यांना परत यायचंय त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत ते लवकरच समोर येतील. काही जणांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहोत मात्र काहींना जबरदस्तीने नेण्यात आले आहे. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा.
आदित्य ठाकरे, शिवसेना नेते
मातोश्रीवर बैठक
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री येथे बैठक घेऊन चर्चा केली.यावेळी संजय राऊत,सुभाष देसाई,अरविंद सावंत,अनिल देसाई आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी- अजित पवार
पुणे : राज्यात शिवसेनेत दोन गट पडले असले तरी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी केला आहे. पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मूळ शिवसेना आहे, असं आम्हाला वाटतं, असं अजित पवार म्हणाले. सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्यावर दोन्ही बाजूनं बोलणारी लोक असतात. काही जण उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागेल, असं वाटतं. मी ज्या वकिलांशी चर्चा केली त्यानुसार पक्षांतर बंदी कायद्याचं तंतोतंत पालन केल्यास 16 आमदारांच्या बाबत वेगळा निकाल लागू शकतो. मात्र, सुप्रीम कोर्ट निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. तुम्ही आम्ही निकाल असा लागला पाहिजे, तसा लागला पाहिजे असं म्हणून चालत नाही. सुप्रीम कोर्ट विचारपूर्वक निर्णय देईल, अशी आशा अजित पवार म्हणाले. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका घेतली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण मध्य प्रदेशमध्ये मिळतं तर महाराष्ट्रात का मिळत नाही, असा सवाल पवार यांनी केला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासहीत स्थानिक स्वराज संस्था निवडणुका व्हाव्यात ही आमची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टात 12 जूनला सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचं काम पूर्ण केलं आहे. बांठिया समितीनं त्यांचा अहवाल दिलेला आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर तो अहवाल बनवण्यात आला आहे.
लोकशाहीच्या संस्था भाजप उद्धस्त करतोय -पवार
औरंगाबाद: भाजपकडून लोकशाहीच्या संस्था उद्धस्त करण्याचं काम सुरू असून कर्नाटक, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही असा प्रयोग राबवला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ झालेले आता कमी अस्वस्थ झाले असतील असा टोला त्यानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मध्यावधी निवडणुका होतील असं कधीच म्हटलं नाही, मी म्हणालो की अडीच वर्षे झाली, आता अडीच वर्षे राहिली, आपण आतापासून निवडणुकीला तयार राहिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे बंड का मोडू शकले नाहीत
शरद पवार म्हणाले की, आमच्यात काही घडलं असतं तर तुमच्या प्रश्नाला उत्तरं दिलं असतं. राष्ट्रवादीच्या सहकार्यांशी संवाद साधण्याचा माझा अधिकार आहे, त्यांनाही तो अधिकार आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या माझ्या सहकार्यांचा समावेश होता. आपली ती भूमिका नाही, भाजपसोबत जायचं नाही असं मी सांगितलं आणि ते परत आले. बाळासाहेब असताना असं काही घडल्यास वेगळी परिस्थिती असायची. उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना हिंसक होऊ नका अशी आदेशवजा सूचना केली, त्यामुळे आज शिवसैनिक शांत असतील.
सरकार पाडण्यासाठी काही निश्चित कारण नव्हतं. कुणी राष्ट्रवादीचे नाव घेतं, कुणी हिंदुत्वाचं कारण सांगतं, तर कुणी ईडीचे नाव घेतलं. ही सर्व कारणं सुरतला गेल्यानंतर ठरली. त्या आधी तसं काही कानावर आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी ते जनतेसमोर यावं आणि स्पष्ट करावं. त्यांच्याकडे काहीच सक्षम कारण नाही.
शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष