निलंबित झालेले कर्मचारी बडतर्फ होऊ शकतात

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचार्‍यांनी अजूनही संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित झालेल्यांना बडतर्फ केले जाऊ शकते. सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
10 हजारपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. प्रशासन कारवाईचे एकएक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत त्यांची बडतर्फी होऊ शकते. सरकारला अशी कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाहीये. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील, असे परब यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्‍यांना मेस्मा लावणार की नवी नोकर भरती करणार? असा सवाल करण्यात आला. त्यावर या संदर्भात बैठक व्हायची आहे. त्यावर निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. एसटीच्या सेवेत आतापर्यंत 22 हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची 125 डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, कोकणात बर्‍यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. 20 तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version