नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

जोडणीसाठी घेतलेला निधी गायब

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतीकडून प्रशासक काळात 25 नळजोडण्या एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आल्या आहेत. त्या नळजोडण्यांसाठी रीतसर देणगी नेरळ ग्रामपंचायतीकडे जमा झालेली नाही. तसेच, त्या नळजोडण्यांसाठी प्रशासक तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून पाणी पुरवठा विभागाला पत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी हा घोटाळा बाहेर काढला असून सर्व नळजोडण्या काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या नळजोडण्यांप्रकरणी प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कोणतीही कारवाई नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाही.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याची व्यावसायिक नळजोडणीसाठी प्रति जोडणी 2 ते अडीच लाख रुपये घेतले जातात. ग्रामपंचायतमधील कारभार सांभाळण्यासाठी हा निधी देणगी म्हणून स्वीकारला जातो आणि त्या निधीची रीतसर पावती देखील दिली जाते. मात्र, मागील सदस्य मंडळात व्यावसायिक नळजोडण्या देताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यावेळी काही हजारांवर व्यावसायिक जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र, देणगी पावती ही ठराविक रकमेची न बनवता बिल्डर लॉबीवर मेहरनजर ठेवली जात होती. त्यानंतर प्रशासक काळात तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार देण्याऐवढी आर्थिक आवक राहिली नाही, असा बोभाटा प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून केला गेला. दुसरीकडे नळजोडण्या देण्याचे कार्य प्रशासन करीत होते आणि नळजोडण्या दिल्यानंतर जमा करावयाच्या देगण्या या ग्रामपंचायतीकडे जमा झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर किरकोळ कामे करण्यासाठी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पगार करण्यासाठी निधी जमा झालेला नाही. प्रशासक पदाच्या काळात हा सर्व प्रकार अधिक वाढला आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर प्रशासक राजवटीत झालेले गैरव्यवहार समोर येऊ लागले आहेत.

या सर्व नळजोडण्या दिल्याबद्दल 2 लाख प्रति एक नळजोडणी याप्रमाणे महसूल देणगी स्वरूपात जमा करण्यात यावे किंवा नळजोडणी अवैध प्रकारे जोडली गेली असल्यास संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, नळजोडणी करून पाणी पुरवठा उचलण्यात येत असल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी केली आहे. परंतु, या घटनेला 8 दिवसांचा कालावधी लोटला असून नळजोडण्या बेकायदेशीर टाकण्याची परवानगी देणाऱ्या प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नेरळ गावातील ग्रामस्थ नेरळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर संतप्त झाले आहेत.

Exit mobile version