आंबा संरक्षणासाठी ‌‘कृती दल’

तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश

| रायगड | प्रतिनिधी |

अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली आहे. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदारी टास्क फोर्सची असेल. आठ सदस्यीय समितीत दापोली कृषी विद्यापिठाचे तज्ज्ञ मार्गदर्शकांचा समावेश आहे. यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांबरोबरच तत्काळ बैठक घेत ‘कृती दल’ स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, ऊस पिकाच्या संरक्षणासाठी कृती दल आहे. मात्र कोकणातील आंबा पिकासाठी आतापर्यंत असे कृती दल कार्यान्वित नव्हते. कोकणात सातत्याने आंबा पिकावर संकट येत आहेत. त्यामुळे आंबा पीक घ्यावे की नाही, या विवंचनेत जिल्ह्यातील आंबा उत्पादक आहे.

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंबा उत्पादकांचे यावर्षीही अवकाळीने चिंता वाढवली आहे. लांबलेली थंडी, ढगाळ वातावरण आणि किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज होती. जिल्ह्यात घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेला पूर्वपट्टा व समुद्रकिनाऱ्यालगतचा पश्चिमपट्टा असे दोन भाग पडतात. साधारण फेब्रुवारी, मार्चपर्यंत किनारपट्टीचे श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, अलिबाग या समुद्रीपट्ट्यात आणि नजीकचा भागात आंबा पीक येते; तर पूर्वपट्ट्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये शेकडो हेक्टर आंबा लागवड केली जाते. या भागातील आंबा हंगाम पश्चिम भागापेक्षा महिना-दीड महिन्याने उशिराने सुरू होतो. या भागातील आंबा हंगाम सुरू होऊन तो मेअखेरपर्यंत चालतो. याच कालावधीत चाकरमानी गावी आल्यामुळे आंब्याची आवकही वाढते. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांना स्वतंत्र बाजारपेठ शोधावी लागत नाही; परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कोकणातील आंबा संकटात सापडला आहे.

घाटमाथ्यानजीकच्या गावांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरणाचे प्रमाण रायगड जिल्ह्यात अधिक आहे. या भागातील आंबा पिकाचे निसर्ग, तौक्ते वादळाने अतोनात नुकसान झाले. यात लाखो आम्रवृक्ष उन्मळून पडले. त्यानंतर गतवर्षी अवकाळी पाऊस झाला. डोंगराळ भागात आंब्याचा हंगाम पावसाळा सुरू होताना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा घेता आला नाही. त्यानंतर या वर्षी उशिराने पडलेल्या थंडीमुळे दहा ते बारा दिवसांपूर्वी आंब्याला मोहोर फुटण्यास प्रारंभ झाला. याशिवाय काही प्रमाणात आंबा उत्पादन मिळण्याची शक्यता होती; परंतु सततच्या अवकाळीने उत्पादनाचा दर्जा खालावला. झाडांवर वरकरणी फळे दिसत असली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे बागायतदार सांगतात. पूर्वपट्ट्याच्या तुलनेत पश्चिमपट्ट्यात अद्याप अवकाळीच प्रमाण कमीच होते. त्यामुळे जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, सुधागड-पाली, कर्जत या पूर्वपट्ट्यातील तालुक्यात आंबा उत्पादन घ्यावे की घेऊ नये, असा प्रश्न बागायतदारांसमोर आहे. अशा येणाऱ्या संकटांमधून मार्गदर्शन करण्यासाठी ‘कृती दल’मधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

फलोत्पादन योजनेंतर्गत आम्ही आंबा लागवड केली. काही वर्षे आंबा लागवडीतून उत्पादनही चांगले मिळाले; परंतु काही वर्षांपासून आंब्यावर लहरी वातावरणाचा मोठा परिणाम होत आहे. या वर्षीही अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे शेंडी पोखरणारी आळी, उंट आळी, फुले खाणारी आळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. जो मोहर आहे, त्यातील फळधारणा होईल, याबद्दल शेतकरी साशंक आहेत.

जगन्नाथ पाटील,
आंबा उत्पादक शेतकरी

‘कृती दल’ खासकरून आंबा पिकाच्या संरक्षणासाठी काम करणार आहे. त्यामुळे त्याचा कोकणातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. वेगवेगळ्या रोगांना वेळेतच रोखण्यात यश आल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या दर्जाचा पीक घेता येईल. यातून निर्यातक्षम आंबा पिकाचे उत्पादन येथील बागायतदारांना घेता येईल.

प्रसाद गायकवाड,
बागायतदार, अलिबाग

‘कृती दल’ संपूर्ण कोकणात कार्यरत आहे. वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांवर सखोल संशोधन करून ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहे. यापूर्वी अशी व्यवस्था नव्हती. परंतु काही वर्षांपासून आंबा पिकावर येणाऱ्या संकटांचा विचार करून अशी व्यवस्था असावी, अशी मागणी केली जात होती. भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी ङ्गटास्क फोर्सफचे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.

उज्ज्वला बाणखळे,
जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी
Exit mobile version