विराट कोहली सामनावीर
| मेलबर्न | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर विजय मिळवित दिवाळीच साजरी केली आहे. टीम इंडियाच्या या थरारक विजयानंतर देशभरात एकच जल्लोष करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. 53 चेंडूत 83 धावा काढणार्या विराट कोहलीचा सामनावीर म्हणून सन्मान करण्यात आला.
पाकिस्तानच्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी चार धावा करून माघारी परतले. नसीम शाहने केएल राहुलची, तर हारिस रौऊफने कर्णधार रोहित शर्माची शिकार केली.
रोहित-राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. मात्र, 10 चेंडूंत 15 धावा केल्यानंतर हारिस रौऊफच्या वेगाने त्याला चकवले. भारतीय संघाने सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डावखुर्या अक्षर पटेलला शादाब खान, नवाझविरूद्ध धावगती वाढवण्यासाठी बढती देऊन पाचव्या क्रमांकावर पाठवले. मात्र, तो केवळ दोन धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली याने 53 चेंडूंत नाबाद 82 धावा केल्या. त्याने या धावा करताना चार षटकार आणि सहा चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्यानेही 40 धावांचे योगदान दिले. यामध्ये एक चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
तत्पूर्वी, भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसर्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची साथ मिळाली. अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक गडी बाद केला.