फलंदाजांनी फोडला साहेबांना घाम

शुभा, जेमिमा, यास्तिका आणि दीप्तीची झुंजार फलंदाजी, पहिल्या दिवशी इंग्लंडसमोर 410 धावांचा डोंगर


| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईमधील डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियानं भक्कम मजल मारली आहे. भारतीय संघाने पहिल्या दिवशी 7 गड्यांच्या मोबदल्यात 410 धावांचा डोंगर रचला. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधना 17 धावा करून तंबूमध्ये परतली. त्यावेळी भारताची धावसंख्या 25 धावा होती. यानंतर शेफाली वर्मा 19 धावा करून बाद झाली.

47 धावांपर्यंत भारताचे दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये गेले होते. मात्र, यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि शुभा सतीश यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी तिसऱ्या गड्यासाठी 115 धावांची भागीदारी केली. शुभा सतीशने 69 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्ज लॉरेन बेलच्या चेंडूवर 69 धावा करून बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावा करून धावबाद झाली. यास्तिका भाटियाने 88 चेंडूंत 66 धावा केल्या.

भारताकडून अष्टपैलू दीप्ती शर्मा 60 धावा करून नाबाद परतली. स्नेह राणाने 30 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी स्नेह राणाला नॅट सीव्हर ब्रंटने त्रिफळाचीत केले. सध्या भारताकडून दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर मैदानावर आहेत. पहिल्या दिवशी भारतासाठी 4 फलंदाजांनी अर्धशतक केली. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर 49 धावांवर धावबाद झाली, त्यामुळे तिला पन्नास धावांचा टप्पा गाठता आला नाही.

इंग्लंडच्या लॉरेन बेल हिने दोन फलंदाज बाद केले. याशिवाय केट क्रॉस, नॅट सीव्हर ब्रंट, शार्लोट डीन आणि सोफी एक्लेस्टोन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

Exit mobile version