मुंबई | प्रतिनिधी |
जगावर सध्या ओमिक्रॉनचं संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे पाच रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आरोग्यविभागाची चिंता देखील वाढली आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
डोंबिवलीतील 33 वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण, ओमिक्रॉनला वेळवर रोखलं नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल. ओमिक्रॉनला थांबविण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करत आहोत. पण, अद्यापही आमची टास्क फोर्ससोबत बैठक झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतल्यानंतर काय निर्णय होतात हे सांगू असेही टोपे म्हणाले.
देशात कर्नाटकात चार दिवसांपूर्वी ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. पण, यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेत प्रवास करून आला होता, तर दुसरा रुग्ण हा बंगळुरूतील एक सरकारी डॉक्टर आहे. त्याने कुठेही प्रवास केलेला नाही. त्यामुळे त्याला कोरोना झालाच कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर गुजरातमधील जामनगर येथे एक रुग्ण आढळला असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील डोंबिवली येथे एक रुग्ण आढळला आहे. आज आणखी दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला असून देशातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या पाच वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील केले जात आहे.