चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता, पंजाबमध्ये ‘आप’; काँग्रेसचे पानिपत, केजरीवाल यांची किमया

I नवी दिल्ली I वृत्तसंस्था I
‘मिनी लोकसभा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांच्या निवडणुकांत भाजपने एकहाती बाजी मारली आहे. तर, पंजाबमध्ये ‘आप’चा सरदार झाला आहे. याठिकाणी काँग्रेसचे पानिपत झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा पुन्हा योगीराज आले आहे. गोवा, उत्तराखंड, मणिपूरमध्येही भाजपचा दबदबा कायम आहे. पंजाबच्या निकालानं पूर्ण राजकारण बदललं असून, पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं इतर पक्षांचा सुपडासाफ केला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज
उत्तर प्रदेशमध्ये भाजपने आपला करिष्मा कायम ठेवला असून, पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजप 265 जागा मिळविल्या असून, तर समाजवादी पक्षाला 133 जागांवर समाधान मानावं लागलं. बसपा तिसर्‍या स्थानी तर काँग्रेसला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

गोव्यात सलग दुसर्‍यांदा सत्ता
गोव्यात भाजप सलग दुसर्‍यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 19 जागांवर आघाडीवर असून, बहुमतासाठी दोन जागांची गरज आहे. गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यामुळं आता भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. गोव्यात 14 मार्च रोजी शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामीमुळे अन्य सर्व पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपलाही चारी मुंड्या चित केले आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आपने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे.

उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता
उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून, इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. ुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मणिपूरमध्ये फुलले कमळ
मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती आले असून, यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकलं आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले आहेत. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.

पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालाय. पणजीमधून भाजपचे बाबूश मोन्सेरात विजयी झालेत.

पंजाबमध्ये कॅप्टन पराभूत
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह तब्बल 14 हजार मतांनी पराभूत झाले आहेत. आपचे उमेदवार अजीत पाल सिंह कोहली यांना जवळपास 14 हजार मतं मिळाली आहेत. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह हे चार वर्षांहून अधिक काळ पंजाबचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर काँग्रेसने त्यांच्याकडून राजीनामा घेतला होता. नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी स्वतःचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस स्थापन केला आणि भाजपशी युती केली. कॅप्टन यांनी दावा केला होता की, आपण अनेक जागांवर निवडणूक जिंकू. पण, प्रत्यक्षात मात्र मोठ्या फरकानं पराभूत झाले आहेत.

Exit mobile version