पुरात हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील गौरकामत ग्रामपंचायतीमधील डोणेवाडी येथील 50 वर्षीय व्यक्ती 13 जुलै रोजी सकाळी प्रचंड पावसामुळे आलेल्या महापुरात वाहून गेला होता. त्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सकाळी उल्हास नदीमधील बेंडसे येथे आढळून आला आहे.

गौरकामत ग्रामपंचायत मधील डोणेवाडी या वाडीमधील बाळू रतन पवार ही कातकरी समाजाची व्यक्ती तब्बेत बरी नसल्याने 13 जुलै रोजी कडाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी निघाली होती. गौरकामत आणि जांभिवली गावाच्या मध्ये असलेल्या लहान ओढ्याला संततधार पावसामुळे भरपूर पाणी होते. त्या ओढ्यावरून वाट काढत असताना बाळू पवार वाहून गेल्याचा शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर बाळू पवार यांच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version