‘हा’ पूल वाहतूकीसाठी खुला

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
आंबेत | वार्ताहर |
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जलद गतीने जोडणारा सावित्री नदीवरील आंबेत पूल अखेर एका वर्षानंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून दुरूस्त झालेल्या या महत्वपूर्ण पूलाचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी लवकरच नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला असून त्यास तातडीने मंजूरी मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील दापोली , मंडणगड व खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल धोकादायक बनल्याने दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवल्याने एस टी महामंडळाच्या बसेस अभावी नागरिक. विद्यार्थी तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. पर्यायी जलमार्गाने रो रो सेवा सुरू करण्यात आली. मात्र ती सर्वसामान्यांना न परवडणारी असल्याने त्रासदायक बनले होते. पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. दुरूस्तीच्या कामासाठी तब्बल बारा कोटी रूपये खर्च करण्यात आले.

यावेळी सा. बा.विभागाचे मुख्य बामणे, राऊत, गोसावी, प्रांत अमित शेडगे, म्हसळा सभापती छाया म्हात्रे, उज्वला सावंत, जि.प. सदस्य बबन मनवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर,दापोलीचे माजी आ.संजय कदम.राष्ट्रवादीचे नेते अजय बिरवटकर,आंबेतचे माजी उपसरपंच नवीद अंतुले भाईजान तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version