संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; शरद पवार गटाची आक्रमक भुमीका
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव येथील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या पंधरा दिवसांत तडे जाऊन खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले नुकसान वसूल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (दि.1) माणगावचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ उपविभागीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना देखील देण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वीही निकृष्ट कामामुळे अनेक अपघात झाले असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही संबंधित यंत्रणा व ठेकेदारांवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रकारांना प्रोत्साहन मिळत आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही. या बाबींचा गांभीर्याने विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, माणगाव येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाला अवघ्या पंधरा दिवसांतच तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे हे ज्वलंत उदाहरण आहे. सार्वजनिक बांधकामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळत नसतील, तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुलाच्या भरावाला तडे जाणे आणि भराव खचणे म्हणजे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. रायगड जिल्ह्यात पुढील काळात मुसळधार पाऊस होणार असल्याने ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे काळ नदी पुलाच्या भरावाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय व स्वतंत्र तांत्रिक चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदार, कामाची देखरेख करणारे अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, शासनाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधित ठेकेदार व दोषी अधिकाऱ्यांकडून सक्तीने वसूल करण्यात यावे, पुलाचा भराव, संरचना व संपूर्ण कामाची गुणवत्ता तातडीने तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, भविष्यात अशा निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी संबंधित अधिकारी व यंत्रणांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाची सुरक्षितता तपासून नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची तात्काळ दक्षता घेण्यात यावी. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, आपण या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीसह श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संताजी पवार, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, महाड शहराध्यक्ष पराग वडके, कार्यकर्ते स्वप्नील सुतार व सीताराम भोनकर आदी उपस्थित होते.
