आयोगाकडून पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवारी (दि. 15) पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांची आणि पदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीचीदेखील घोषणा करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केली. निवडणुकीच्या घोषणेनंतर संबंधित राज्यांमध्ये आजारसंहिता लागू झाली आहे. याठिकाणी सत्तासंघर्ष शिगेला पोहोचणार असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये तगडी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे आसाम, केरळ, पुदुच्चेरी येथे 9 एप्रिल 2026 रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. तर, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार असून, येथे 23 आणि 29 एप्रिल 2026 रोजी मतदान होईल. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 मे 2026 रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये एकूण 17.4 कोटी मतदार आणि 824 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे 2.19 लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, साधारणः 25 लाख कर्मचारी निवडणूक कामात तैनात केले जातील. आसाम विधानसभेची मुदत 20 मे, केरळची 23 मे, पुद्दुचेरीची 15 जून, तामिळनाडूची 10 मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत 7 मे रोजी संपत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदारांच्या संख्येचा आढावा देताना सांगितले की, अंतिम यादीनुसार आसाममध्ये सुमारे 2.25 कोटी, केरळमध्ये 2.7 कोटी, पुद्दुचेरीमध्ये 9.44 लाख आणि तामिळनाडूमध्ये 5.67 कोटी मतदार आहेत; तसेच 28 फेब्रुवारीच्या अंतिम यादीनुसार पश्चिम बंगालमध्ये 6.44 कोटी मतदार असून, माननीय न्यायाधीशांच्या निर्णयानुसार जी काही अतिरिक्त (पुरवणी) यादी येईल, ती यामध्ये नंतर समाविष्ट केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, या निवडणुका म्हणजे केवळ लोकशाहीची प्रक्रिया नसून, भारताच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव आहे. तो आपल्या देशातील विविधतेतील एकता खऱ्या अर्थाने अधोरेखित करतात. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये 100 वर्षांहून अधिक वयाचे (शतायुषी) आणि 85 वर्षांवरील मतदारांची संख्या लक्षणीय आहे. निवडणुकीसाठी एकूण 2.18 लाख मतदान केंद्रे उभारली जातील. प्रत्येक केंद्रावर सरासरी 750 ते 850 मतदार असतील. सर्व राज्यांत आदर्श मतदान केंद्रे उभारली जातील. काही केंद्रे पूर्णपणे महिलांद्वारे, तर काही दिव्यांग बांधवांद्वारे चालवली जातील; तसेच सर्व मतदान केंद्रांवर 100% वेबकास्टिंग (थेट प्रक्षेपण) करण्याची सोय असेल, असेही ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीची घोषणा
गोवा, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, त्रिपुरा राज्यातील पोटनिवडणुकांचीदेखील घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुल विधानसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होईल आणि 4 एप्रिलला निकाल जाहीर होतील, असं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली.
बारामती, राहुरी निवडणुका बिनविरोध होणार?
महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी, तर अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांचे ऑक्टोबर 2025 मध्ये निधन झाले होते. या जागेसाठीही बारामतीसोबतच 23 एप्रिलला मतदान होईल. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागांवर संबंधित नेत्यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पदुच्चेरीमध्ये 30 या तीनही ठिकाणी 296 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तीनही ठिकाणी 9 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे ला निकाल जाहीर होतील. तामिळनाडूतही एकाच टप्प्यात निवडणूक होईल. तामिळनाडूमध्ये सर्व 234 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होईल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान पार पडेल. पहिल्या टप्प्यात 152 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडेल. तर दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी 29 एप्रिलला मतदान पार पडेल. यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होईल.
आसाममध्ये 126 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. आसाममध्ये 9 एप्रिलला सर्व 126 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर 4 मे रोजी निकाल जाहीर होतील. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार हे 23 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकणार आहेत. तर 26 एप्रिलला अर्ज मागे घेता येईल.
आसाम : 126 जागा
पश्चिम बंगाल : 294 जागा
केरळ : 140 जागा
तामिळनाडू 234ः जागा
पडुचेरी 30ः जागा
पश्चिम बंगालमध्ये भाजपविरुद्ध ममता बॅनर्जींचा सामना
294 विधानसभा मतदारसंघ असणारे पश्चिम बंगाल राज्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात असून, तिथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुमारे 480 कंपन्या आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याच्या तयारीत आहेत, तर विरोधी पक्ष भाजप सत्तापालट करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे.
तामिळनाडूतील सत्ता अबाधित ठेवण्याचे स्टॅलिन यांच्या समोर आव्हान
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन सलग दुसऱ्यांदा सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना एआयएडीएमके आणि भाजप युतीचा सामना करावा लागणार आहे. मात्र, यावेळचे मोठे आकर्षण म्हणजे अभिनेते आणि राजकारणी विजय यांनी त्यांच्या टीव्हीके पक्षासह राजकारणात एन्ट्री केली आहे. यामुळे राज्यातील निवडणुका तिरंगी होणार आहेत.
केरळमध्ये डावे विरुद्ध काँग्रेस
केरळमध्ये येथे नेहमीप्रमाणे डावे विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा असलेल्या या राज्यात सीपीएमचे ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन सलग दुसऱ्यांदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अंतर्गत गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
आसाममध्ये भाजपचे मुख्यमंत्री सरमा यांची कसोटी
ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दुसऱ्या टर्मसाठी सज्ज आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुनरागमन करण्याच्या आशेवर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे.
पुद्दुचेरीत मुख्यमंत्री एन. रंगासा मी सत्ता अबाधित ठेवण्याच्या प्रयत्नात
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथे ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि मुख्यमंत्री एन. रंगासामी तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधी पक्ष डीएमके बदलासाठी जोर लावत आहे.
