तिसऱ्या विश्वचषक विजेतेपदासाठीच्या मोहिमेला भारताने चेन्नईतून विजयाने आरंभ केला. अपेक्षेप्रमाणे भारताच्या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकूटाने विजयासाठीचे आव्हान 200 धावसंख्येवर मर्यादित ठेवले. मात्र, या अल्प आव्हानाचा पाठलाग करताना विश्वविजेते होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारताची धावसंख्या 3 बाद 2 अशी होती. हे लक्षण चांगले नाही. मात्र, त्यानंतर अनुभवी विराट कोहली आणि के.एल. राहुल यांची 165 धावांची भागिदारी भारतीय क्रिकेटपटूंच्या क्षमतेची ताकद दाखविणारी होती. चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडू थांबून येत होता. चेंडूची लकाकी टिकेपर्यंत तो गोलंदाजांना साथ देणारा होता. मात्र, एकदा का लकाकी गेली आणि सायंकाळी दव पडायला सुरूवात झाली की, मग गोलंदाजांची कसोटी होती. पण, सुरुवातीची 10-12 षटकेच खेळताना भारताने कर्णधारासह तीन मोहोरे गमाविले.
भारतीय संघाला अद्याप चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज कोण, हे ठामपणे ठरविता आलेले नाही. चेन्नईत त्यांनी श्रेयस अय्यरला खेळविण्याचा केलेला प्रयोग सपशेल अपयशी ठरला. सलामीपासून मधल्या आणि त्याखाली फलंदाजी करणाऱ्या केएल राहुलला यावेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याशिवाय तो यष्टीपाठीही उभा असतो. मधल्या फळीत खेळण्याचे प्रयोजनच ते होते की, यष्टीरक्षणामुळे आलेल्या थकव्यानंतर किंचित खाली फलंदाजीला यायचे.
विराट कोहली हा संघातील सर्वाधिक अनुभव फलंदाज आहे. एका बाजूला नांगर टाकून तो उभा होता. अनेकदा ‘बीट’ही झाला. एकदा तर त्याचा झेलही सुटला. पण, तरीही तो अविचल राहिला. परंतु, त्यापेक्षा कौतुक राहुलचे वाटते. आजारपणातून, दुखापतीतून तो नुकताच बाहेर आलाय. संघासाठी एक ते सात क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करायची त्याची तयारी आहे. संघासाठी त्याने यष्टीरक्षणाचे ग्लोव्हजही घातले आणि एक फलंदाज अधिक खेळविण्याची संधी भारताला दिली. या राहुलने कोहलीला आत्मविश्वास दिला. कारण, समोरुन विकेट पडत असतील, तर कोणताही प्रतिथयश फलंदाजदेखील शांत डोक्याने फलंदाजी करु शकत नाही. राहुलने पाचवाच चेंडू ज्या पद्धतीने कव्हर्समधून सीमापार पाठविला, त्यावरुन चेन्नईची सायंकाळ त्याची होती हे सूचित होत होते. आणि विराट कोहलीचा हेझलवूडच्या गोलंदाजीवर उडालेला सोपा झेल जेव्हा मिशल मार्शने सोडला, तेव्हा आजचा दिवस भारताचा आणि विजय आपलाच होणार हेही सूचित होत होतं. ऑस्ट्रेलियाने राहुलच्या स्वेअरकटसाठी झंपा या लेगस्पिनरला राखून ठेवला होता. झंपाची गुगली राहुलचा त्रिफळा उद्ध्वस्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सापळा लावला. थर्डमॅन सीमारेषा मोकळी ठेवून राहुलला या सापळ्यात पकडण्यासाठीचे आमिष दाखविण्यात आले. पण, राहुलने झंपाच्या पहिल्याच षटकात दोन स्क्वेअरकटचे चौकार मारले आणि आपण या सापळ्याला घाबरत नाही, हे दाखवून दिले. त्याच षटकातील त्याच्या कव्हर्समधील चौकाराने झंपाच्या लेग ब्रेक गुगली गोलंदाजीची लयच बिघडवून टाकली.
ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्धच्या युद्धातील हे अस्त्र राहुलने असे बोथट केले होते. राहुलने मग स्टार्क, हेझलवूड या ऑस्ट्रेलिया दोन भेदक गोलंदाजांची गोलंदाजीही सहज खेळून काढली. त्याचे चौकार आणि दोन षटकार त्याच्या समयोचित आणि परिपक्व अशा 97 धावांच्या नाबाद खेळीची साक्ष देत होते. कोहली आणि हेझलवूड यांच्यातील संघर्ष मात्र त्यावेळी प्रेक्षकांची अधिक करमणूक करीत होता. संथ खेळपट्टीवरदेखील हेझलवूडने बाऊन्सर्सचा कल्पक वापर केला. त्यातील एक कोहलीच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर मात्र हेझलवूडविरुद्धच्या युद्धात कोहलीने हाराकिरी केली. एक आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटवर सोपा झेल दिला. तोपर्यंत सामना भारताच्या हातात आला होता. कोहलीचे काम संपले होते.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सलामीची लढत जिंकून विश्वचषक विजयाच्या मोहिमेला भारताने सुरूवात केली. या मोहिमेदरम्यान येणाऱ्या अनेक संकटांपैकी एका संकटाची झलक आपण पाहिली. 3 बाद 2 या धावसंख्येवरुन मिळविलेला विजय कौतुकास्पदच म्हणावा लागेल. परंतु, ऑस्ट्रेलियापेक्षा तगडे आणि धूर्त प्रतिस्पर्धी या स्पर्धेत आहेत. त्यांचा सामना करताना आपल्या संघाला अधिक सज्ज व्हावे लागेल.








