नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या अनेक दशकांपासून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी विदर्भवासियांनी अनेकदा आंदोलने देखील केली. आता केंद्र सरकारने विदर्भ राज्याबाबत संसदेला महत्त्वाची माहिती दिली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे विदर्भवासियांची वगळ्या विदर्भ राज्याची इच्छा अधुरीच राहणार हे नक्की.
विदर्भ राज्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले. महाराष्ट्र सोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे किंवा करण्याचा प्रस्ताव आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर वेगळ्या विदर्भ राज्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. नवीन राज्यांच्या निर्मितीसाठी विविध व्यक्ती आणि संघटनांकडून वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे.
नवीन राज्याच्या निर्मितीचे व्यापक परिणाम आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या संघीय राजकारणावर होतो. नवीन राज्यांच्या निर्मितीबाबत सरकार सर्व संबंधित घटकांचा विचार करून निर्णय घेते असे केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले.
महाराष्ट्रात विदर्भाचा विकास करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला आमचे स्वतंत्र राज्य तयार करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विदर्भवाद्यांकडून होताना पाहायला मिळत आहे. स्वतंत्र विदर्भ होण्यासाठी गेली अनेक दशकांपासून आंदोलन देखील केल्या जात आहे. मात्र आज केंद्राने स्वतंत्र विदर्भ होणार नाही हे स्पष्ट केले आहे.