राकेश टिकैत यांचा इशारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गेल्या एक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी या शेतकर्यांची आहे. मात्र, अद्याप या कायद्यांसंदर्भात कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. याच दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत वादग्रस्त कृषी कायदे रद्द न केल्यास शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.
टिकैत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सांगितले की, केंद्र सरकारकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत त्यांनी कायद्यांसदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा 27 नोव्हेंबरपासून शेतकरी गावागावांतून ट्रॅक्टरने दिल्लीच्या सीमेवर तसेच आसपासच्या आंदोलनस्थळी पोहोचतील आणि भक्कम तटबंदी करतील. असे ते म्हणाले.