पाच किमी वाहनांच्या रांगा
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याला जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग 4 ब वर अपघात झाल्याने, पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. अपघातामध्ये कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. परंतु रहिवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
जेएनपीए बंदरासाठी आयात निर्यात आणि उरण तालुक्याला जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग 4 ब वर शनिवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास दोन कंटेनर ट्रेलर मध्ये झालेल्या अपघातामध्ये केमिकल वाहून नेणारा कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले. यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठून आले होते. या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती. घटनास्थळी वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. सदर घटनेवर नियंत्रण आणण्यास सर्वांना यश आल्याने, बंदर परिसराकडे व मुंबई-नवीमुंबई शहराकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
महामार्गवरील अवैद्य अवजड वाहनांची पार्किंग, बेदरकार वाहनांची वर्दळ, वाहतूक नियमाची होनारी पायमल्ली यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होतं असतात. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अपघातानंतर होणार्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारावर देखील परिणाम होतं असतो. यामुळे या मार्गवरील होणार्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे झाले आहे. अशी मागणी चिर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.