देशानं रत्न गमावलं!

दत्तात्रय शेकटकर  

हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानं भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 13 जणांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल. तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं झालेल्या या अपघातामध्ये भारतानं एक रत्न गमावलं आहे. अशाप्रकारची भारताच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती हीच भारताच्या इतिहासातली खूप मोठी गोष्ट होती. त्याआधी भारतात हे पदच नव्हतं. त्यामुळेच ही एक ऐतिहासिक घटना मानली गेली.  योग्यता पाहूनच केंद्र सरकारनं या अतिशय महत्त्वाच्या पदासाठी त्यांना निवडलं होतं. प्रथमच संरक्षण मंत्रालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ मिलीटरी अफेअर्स या नावाचं डिपार्टमेंट उघडलं गेलं आणि बिपीन रावत त्याचे अध्यक्ष झाले. त्यांच्या काळात अनेक मोठ्या सुधारणा बघायला मिळाल्या.
शेकटकर कमिटी रिपोर्टमध्ये केंद्रसरकारला काही बाबी सुचवण्यात आल्या होत्या. त्यातच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पद ठेवण्याविषयीच्या सुचनेचा अंतर्भाव होता. या समितीच्या अध्यक्ष म्हणून काम बघताना या पदी कोणाची निवड करायची हे आम्ही सुचवलं नव्हतं. तो निर्णय सरकारवर सोपवण्यात आला होता, मात्र हे पद आवश्यक असल्याचं या समितीनं निदर्शनास आणून दिलं होतं. याची दखल घेत केंद्रसरकारनं तात्काळ हे पद निर्माण करुन बिपीन रावत यांची नियुक्ती केली. त्याअन्वये त्यांच्यावर वायू सेना, नौसेना, स्थलसेना आणि कोस्ट गार्ड या सगळ्यांच्या कामामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आली. मुख्य म्हणजे यापूर्वी हे पदच अस्तित्वात नसल्यामुळे ही जबाबदारी पेलण्याचं शिवधनुष्य खूप मोठं होतं. मात्र बिपीन रावत यांनी ते खंबीरपणे उचललं.
मागच्या वर्षी चीननं गलवानमध्ये आगळिक केली, त्यांच्या हल्ल्यात आपले काही जवान शहीद झाले तेव्हा घटनेच्या अवघ्या दोन तासाच्या आत बिपीन रावत स्वत: तिथे पोहोचले होते. त्यांच्याबरोबर सेनाध्यक्षही होते. इतक्या कमी वेळेत इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती घटनास्थळी पोहोचण्याची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. यालाच आपण कर्तव्यनिष्ठा म्हणतो. त्यांच्या त्या कृतीतून देशाप्रतीची निष्ठा दिसलीच त्याचबरोबरच देशाची काळजीही दिसली. त्या घटनेनंतर त्यांनी अतिशय कडक सुचना दिल्या. त्यानुरुप सैन्याध्यक्षांच्या निर्देशानुसार रातोरात भारतीय सैन्यानं अशा जागी कब्जा केला ज्याची चीननं कधीही कल्पना केली नव्हती.
त्या जागेचा चीननं कधी विचारही केला नव्हता तिथे आपण पोहोचलो. थोडक्यात सांगायचं तर अशी दक्ष लोकं सैन्यामध्ये, सैन्यव्यवस्थेमध्ये येतात तेव्हा जग त्या व्यवस्थेकडे आदरानं पाहू लागतं. ती व्यक्ती जगाची आपल्याकडे पाहण्याची नजर बदलवून टाकते. साहजिकच देशाच्या गौरवात भर पडते. बिपीन रावत यांनी भारताला हा गौरव मिळवून दिला. म्हणूनच त्यांचं अपघाती निधन धक्का देऊन जाणारं आहे.
मागच्या दोन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर भारतानं मिळवलेलं मानाचं स्थान प्रकर्षानं दिसून येतं, यामध्ये रावत यांचं मोलाचं योगदान मान्य करावं लागेल. अलिकडेच रशियाचे राष्ट्रपती भारतात येऊन गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्रीही होते. याचप्रमाणे आधी अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांनी भारताला भेटी दिल्याचं आपण पाहिलं आहे. या देशांच्या उच्चपदस्थांच्या मनात भारताप्रती आदर आणि भारताच्या योग्यतेप्रती खात्री असल्याखेरीज हे घडणं शक्य नाही. याचं श्रेय बिपीन रावत यांच्याकडेच जातं. दुसर्‍या शब्दात सांगायचं तर त्यांच्या कार्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली. आज अनेक देश भारताच्या वाटेला जाऊ नका, असं म्हणताना दिसतात. आजचा भारत दहा वर्षांपूर्वी होता तसा राहिलेला नाही, हे अनेक देशांनी आता मान्य केलं आहे. या बदलाचं श्रेयही केंद्रशासनाबरोबर आपल्या सेनाअधिकार्‍यांकडे जातं. त्यातलं एक नाव बिपीन रावत हे होतं. दुर्घटनेत आपण इतकं मोठं नाव गमावलं आहे. एखाद्या देशाच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं पत्नीसवे अपघाती निधन होण्याची घटनाही जगात पहिलीच आहे. हेदेखील दुर्दैव म्हणावं लागेल. हा अपघात घडलेल्या भागात एक वर्ष वास्तव्य केल्यामुळे मला तो परिसर पूर्णपणे परिचित आहे. पुणे-मुंबई प्रवासात लोणावळा, खंडाळा, खोपोली अशी पर्वतक्षेत्र लागतात तशीच भौगोलिक रचना त्या भागातही पहायला मिळते. हा अपघात झाला त्या कुन्नूर भागात अचानक वादळ येतं. अचानक वार्‍याचा वेग वाढतो. मागच्या पाच-सहा दिवसांमध्ये या भागात मोठा पाऊसही झाला. वादळी स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून हवामान बिघडलं होतं. त्यामुळेच हेलिकॉप्टर भरकटलं आणि दुर्घटनाग्रस्त झालं. खरं पाहता अशा धोकादायक स्थितीमध्ये विमान अथवा हेलिकॉप्टरच्या उड्डाणास परवानगी दिली जात नाही. अगदी ऐनवेळीही उड्डाणं रद्द केली जातात. मात्र सदर घटनेमध्ये अगदी अचानक पर्यावरणीय बदल घडून आल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच सगळी खबरदारी घेऊनही हा अपघात घडला ज्यामध्ये देशानं एक प्रभावी व्यक्तिमत्त्व गमावलं. त्यांची उणीव कायमचं जाणवत राहील.

मुत्सद्दी सेनानायक – अनिल आठल्ये( निवृत्त कर्नल )
जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघतात झालेल्या दुर्दैवी निधनामुळे एका मोठ्या पर्वाचा अंत झाला असं म्हणावं लागेल. ऐतिहासिकदृष्ट्या शांतताकाळामध्ये सर्वसाधारणपणे सैन्यप्रमुखकांची भूमिका गौण असते. परंतु, जनरल रावत याला अपवाद होते. त्यांच्याच काळात सीएसएस म्हणजे तिन्ही सैन्य दलांचा प्रमुख हे पद निर्माण केलं गेलं आणि ते पद भूषवण्याची प्रथम संधी जनरल रावत यांना मिळाली. त्या दृष्टीने भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात त्यांचं नाव नक्कीच नोंदवलं जाईल. आजवर आपण लढलेल्या सर्व लढायांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता देशाच्या तिन्ही सैन्यदलांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याचं नेहमीच दिसून आलं. जनरल रावत यांनी सीडीएस पदावर राहताना हा अभाव दूर करण्याचा खूप मनापासून प्रयत्न केला. अर्थातच त्यामध्ये त्यांना बर्‍याच टीकेलाही तोंड द्यावं लागलं. उदाहरणार्थ हवाई दल हे सेनेला मदत करणारं एक अंग आहे, असं वक्तव्य करून त्यांनी अनेक लोकांचा मुखभंग केला होता. परंतु, आपण सत्य बघितलं तर लष्कर तसंच नौदल या दोन्ही दलांना हवाई दलाची मदत नक्कीच लागते. पण हवाई दल स्वत:हून लढाई कधीच लढू शकत नाही. कारण हवेत राहून आपण ना काही जिंकू शकतो ना काही ठेऊ शकतो. हे सत्य दुसर्‍या महायुद्धापासून समोर आलं आहे. परंतु, सत्य हे आहे की अनेकदा सैन्याच्या तिन्ही अंगांमध्ये  असणारे अंतर्गत वाद हा प्रकार अतिशय महत्त्वाचा ठरतो. बाहेर त्याची विशेष वाच्यता होत नाही. परंतु, हे प्रकार घडतात हे सत्य आहे. त्यामुळे या सगळ्या समस्यांना सामोरं जाऊन जनरल रावत यांनी आपल्या दोन एक वर्षांच्या कालावधीत तिन्ही सैन्यांचं एकत्रिकरण करून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल इतिहास आणि देश नक्कीच त्यांची आठवण ठेवेल.
सीडीएस किंवा तिन्ही सेनांचा प्रमुख म्हणजे सैन्य दलांच्या पाठीचा कणा आणि हे पद म्हणजे एक प्रकारे राजकीय आणि लष्कराचं मिश्रण आहे. त्यामुळे अनेकदा जनरल रावत यांनी राजकीय गोष्टींवर भाष्य केल्यानंतर  अनेकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की युद्धाचं उद्दिष्ट हे नेहमीच राजकीय असतं! आपल्या इथे आत्तापर्यंत असं पद निर्माण केलं गेलं नव्हतं. त्यामुळे या पदाच्या मर्यादा किंवा या पदाचं महत्त्व किवा या पदावरील व्यक्तीची नेमकी भूमिका काय याबद्दल आपल्या राजकीय लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे काही कारण नसताना जनरल रावत यांना विशेष करून विरोधी पक्षांकडून सतत टीकेला सामोरं जावं लागलं. त्यांच्याविरोधात अत्यंत चुकीची भाषाही वापरण्यात आली.
देशाचे पंतप्रधान कधीच दुसर्‍या देशाला धमक्या देत नाहीत.  शत्रुला धमक्या देणं हे तिन्ही सैन्य दलांच्या लष्करप्रमुखांचं काम असतं आणि हे काम जनरल रावत पंतप्रधानांच्या इशार्‍यानुसारच करत होते यात अजिबात शंका नाही. परंतु, आपल्याकडे अद्यापही गर्भित गोष्टी विरोधकांच्या पचनी पडल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना अनाठायी टीकेला सामोरं जावं लागलं. जनरल रावत यांच्या अनेक निर्णयांमुळे सैन्यातल्या काही लोकांचे हितसंबंध दुखवले गेले. त्यामुळे काही सैन्य अधिकार्‍यांनी आणि त्यातही निवृत्त सैन्य अधिकार्‍यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या एकंदर कारकिर्दीचा विचार केला तर चीन, पाकिस्तानचं आव्हान, अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली स्थिती अशा अत्यंत कठीण प्रसंगी जनरल रावत यांनी तिन्ही सेनांचं उत्कृष्ट प्रकारे नेतृत्व करून देशाची खूप मोठ्या प्रमाणात मदत केली.

Exit mobile version