। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील विकासाला चालना देणारे दोन महत्त्वाचे प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडल्याने माणगाव तालुक्याचा विकास दिवसेंदिवस खुंटत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. कंभे जलविद्युत व पन्हळघर येथील धरण हे महत्त्वाचे दोन प्रकल्प रखडले असून, हे दोन्ही प्रकल्प सध्या कोमात गेले आहेत. याकडे शासनांनी पूर्णतः डोळे झाक चालवली आहे. या बहुउद्देशीय प्रकल्पाची योजना माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांची होती. ज्यामुळे वर्षभर वीज व पाणी या मूलभूत गरजांचे निराकरण हमखास होईल. कृषी व उद्योगाला चालना मिळून मागासलेल्या कोकणाचा विकास होईल. परंतु, त्याच्या अल्प कारकीर्दीमुळे ही योजना मागे पडली.
सर्वच पक्ष मागासलेल्या कोकण विकासाच्या गप्पा मारत असले तरी मागासलेल्या कोकणाचा अनुशेष भरून काढण्याचे आश्वासन देत असले तरी ज्या प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाले त्यावर 200 कोटी 12 लाख 37 हजार रूपये खर्च झाले. पण, सर्व प्रकल्प 30 टक्के राहिलेल्या कामामुळे धूळ खात पडला आहे. तसेच कालबद्ध पद्धतीने नियोजन केले नाही तर प्रत्यक्षात लाखो रूपये खर्च होऊनदेखील मूळ उद्देश कसा विफल होतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव, जवळचे 9 कोटी रूपये खर्च होऊनही 45 वर्षांनंतरही अर्धवट असलेले पन्हळघर धरण.