धुळीचा कहर, जनता बेजार

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा आणि अलिबाग-रेवदंडा मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून, धुळीने नागरिक अक्षरशः गुदमरुन गेले आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेच्या आरोग्यावर बुलडोझर फिरवला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. धुळीचा त्रास रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. याकडे एमएसआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे.

नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले असून, यामुळे नागरिकांना कायमची सर्दी होऊन त्याची ॲलर्जी होण्याची शक्यता आहे. श्वसनाचे विकार होऊन यामुळे फुफ्फुसांना त्रास होणे, दमा होणे, त्याचप्रमाणे नाकातोंडातून धुलीकण आत गेल्याने आधीच दमा असलेल्या रुग्णांना याचा त्रास होतो. डोळे सुजून खाज निर्माण होणे, डोळे लाल होणे, त्वचेचे आजार होणे, यासारख्या अनेक समस्यांना नागरिकांना सामारे जावे लागत आहे. अलिबाग ते रोहा आणि अलिबाग ते रेवदंडा या भागात ही परिस्थिती तीव्र असल्याने यामुळे अचानक एखादे वाहन समोरे आल्याने आणि वाहनचालकांच्या डोळ्यात, नाकातोंडात ही धूळ गेल्याने मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

धुळीच्या कणांनी वाहनचालक बेजार
दुचाकी वाहनचालकांना सर्व मार्गांवर हा प्रकार सोसावा लागत आसल्याने आता वाहनचालकांनी यासाठी तीव्र रोष व्यक्त केला आहे. डोळ्यात धुलीकण जाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणे असे आहे. असे असताना आणि हे सर्व एमएसआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला समजत असतानाही ते अद्याप का शांत आहेत, असा सवाल करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीच्या, डांबराच्या कणांनी मानवी जीवनाचे आरोग्य खराब होत असून, याचा परिणाम भोगावा लागत आहे. आज या मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडालेला असताना त्याचप्रमाणे रस्त्याच्या समस्येत आता पुन्हा उडणाऱ्या धुलीकणांची भर पडल्याने या जीवघेण्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना समस्यांचा विसर
अधिकाऱ्यांना या समस्या दिसत नसतील, हे शक्यच नाही. जर ही समस्या सुटत नसेल, तर अधिकाऱ्यांनी यावर उपाययोजना का नाही केली, असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था असताना, आता तर धुलीकणांनी नागरिक बेजार झाले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या मोनिका धायतडक यांनी रस्त्यावर तात्काळ डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचा त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे.

गाव अन्‌‍ गावालगत असणाऱ्या ठिकाणचा रस्ता उकरुन ठेवण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने धूळ उडते. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्ता आमच्यासाठी आहे की आमचा जीव घेण्यासाठी? ठेकदाराचा हजलगर्जीपणा आणि प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार याला जबाबदार आहे. तात्काळ उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होईल.

-रुपेश पाटील,
सामाजिक कार्यकर्ते

तालुक्यात रस्त्याच्या भूमीपूजनासाठी मोठमोठ्या पाट्या लावल्या जातात. दोन-दोनदा, तीन-तीनदा नारळ फोडले. मग दमदार विकासाची हीच परिभाषा आहे का? अलिबाग-बेलकडेपर्यंत जाताना जनतेला अनेक आजार झालेत. धुळीचे लोट उसळत आहेत. यावर कुणी बोलत नाही. ही बोलण्याची जबाबदारी कोणाची आहे? संबंधित प्रशासनाकडून बघ्याची भूमिका आहे. याविरोधात जाब विचारणार आहे.

– सुरेश घरत,
शेकाप तालुका चिटणीस

Exit mobile version