| रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी साचलेल्या मातीच्या धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात कडेच्या चिखलावरून जाताना पादचारी, हलकी वाहने घसरून पडत होती.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात चौपदरी आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात दुपदरी काँक्रीटचे रस्ते आहेत. रस्त्याच्या कडेला पावसाळ्यात धूप होऊन आलेली माती काही ठिकाणी साचलेली आहे. ही माती पावसाळा संपल्याने वाळली आहे. त्यामुळे धूळ उडत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या धुळीचा पादचारी, दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि प्रवाशांना त्रास होत आहे. साचलेली माती गोळा करून काढून टाकावी, अशी मागणी चावणे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मारुती पाटील यांनी केली आहे.