पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन
। पनवेल । वार्ताहर ।
गतवर्षी मोरबे धरण 100 टक्के भरले होते. यंदा परतीच्या पावसाने महाराष्ट्रभर तडाखा दिला असून नवी मुंबई शहरातही परतीचा पाऊस झाला. पण मोरबे धरण परिसरात मात्र पावसाने पाठ फिरवली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पूर्ण भरले नसून नवी मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याचा वापर जपूनच करावा लागणार आहे. तर दुसरीकडे पालिकेने नव्या जलस्त्रोतांच्या पर्यायासाठी अंबा व कुंडलिका येथील पाणी आणण्यासाठी रायगड कोलाड येथील जलसंपदा विभागाला अहवालासाठी स्मरणपत्र दिले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
शहरापेक्षा मोरबे पाणलोट क्षेत्रात एकूण पावसाचे प्रमाण चांगले असून यंदा गेल्यावर्षी प्रमाणे 100 टक्के धरण भरले नाही. मोरबे धरणात 93.73 टक्के जलसाठा आहे. परंतू गेल्यावर्षी हाच जलसाठा 1 नोव्हेबरला 95.27 टक्के होता. त्यामुळे नवी मुंबईकर नागरीकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. 332 दिवस पुरेल एवढा जलसाठा धरणात शिल्लक आहे. गेल्यावर्षी 29 सप्टेंबरला 100 टक्के धरण भरले होते.
यंदाही मोरबे धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे जादाचे पाणी सांडव्यावरील दोन वक्राकार दरवाजे उघडे करुन मूळ धावरी नदी पात्रात सोडण्याची तयारीही पालिका प्रशासनाने केली होती. तसेच मोरबे धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी धावरी नदीकाठावर वसलेल्या गावातील लोकांनी नदीपात्रात जाऊ नये व सतर्कता बाळगावी असे पत्रही पालिकेने जिल्हाधिकारी रायगड, यांच्यासह विविध विभागांना पाठवलेही होते. परंतु पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात व परतीच्या पावसात शहरात चांगला पाऊस पडत असताना मोरबे धरणात मात्र पाऊस पडत नसल्याने यंदा मोरबे धरण यंदा 100 टक्के भरले नाही.
मोरबेच्या पाण्यावर जलसंपन्न शहर म्हणून नावलौकीक मिळालेले नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण शहराला वरदान ठरलेले असले तरी सातत्याने वाढत जाणारी लोकसंख्या व पावसाचा लहरीपणा यामुळे पालिकेने नवीन जलस्त्रोंतांची पर्यायी व्यवस्था शोधत असून रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंडलिका नदीतील जलविद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी नवी मुंबईत आणण्यासाठी पालिकेने तयारी सुरु केली आहे.
गेल्यावर्षी 2022 ला मोरबे धरण 100 टक्के भरले होते. परंतू यावर्षी धरण शंभर टक्के भरले नाही. त्यामुळे नागरीकांनी पाण्याची आतापासूनच बचत करावी पाणी वाया घालवू नये. शहरासाठी नवीन पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करण्याची तयारी सुरु असून अंबा व कुंडलिका येथील जलविद्युत प्रकल्पातील विसर्गाचे पाणी आणण्याबाबतचा अहवाल देण्यासाठी पालिकेकडून स्मरणपत्र दिले आहे.
संजय देसाई
शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका