पराभवानंतर कर्णधार कोहलीची कबुली
इंग्लंड | वृत्तसंस्था |
पहिल्या डावातील पडझड अनपेक्षित आणि विचित्र होती, असे विधान इंग्लंडविरुद्ध तिसर्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत भारतीय फलंदाजांवर सातत्याने दडपण टाकले. पहिला डाव अवघ्या 78 धावांवर आटोपल्यानंतर पुनरागमन करणे अवघड झाल्याचेही कोहलीने मान्य केले. हेडिंग्ले येथे झालेला तिसरा कसोटी सामना इंग्लंडने एक डाव आणि 76 धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांत आटोपला. इंग्लंडने 432 धावांची मजल मारत पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी मिळवली. चांगल्या सुरुवातीनंतर दुसरा डाव 278 धावांत संपुष्टात आल्याने भारताने हा सामना डावाने गमावला.