पक्षांतर्गत विरोधकांचा सूर, सिब्बलांच्या घरी खलबतं
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी दिल्लीमधील आपल्या घरी विरोधकांसाठी डिनरचं आयोजन केलं होतं. कपिल सिब्बल यांनी वाढदिवसानिमित्त हे डिनरचं आयोजन केलं असलं तरी यावेळी चर्चा मात्र मोदी सरकारविरोधात सुरु होती. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधील बदलांसंबंधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले. गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडलं तरच पक्ष मजबूत करणं शक्य असल्याचंही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. यावेळी गांधी कुटुंब उपस्थित नव्हतं.
2014 मध्ये पराभव झाल्यानंतर पक्षाची घसरण होऊ लागल्याने चिंता व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिणार्यांमध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. काँग्रेस नेत्यांच्या या धाडसी पत्रामुळे त्यावेळी खळबळ माजली होती. या पत्रात काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची मागणी करत नेतृत्वासंबंधीही मत व्यक्त करण्यात आलं होतं. आमंत्रितांमध्ये पी चिदंबरम, शशी थरुर आणि आनंद शर्मा यांचाही समावेश होता. या तिघांनाही पक्षाच्या भवितव्यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. डिनर पार्टीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, तृणमुल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला उपस्थित होते.
यावेळी कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करत कशाप्रकारे त्यांच्या काळात प्रत्येत संस्था नष्ट केली जात आहे याचा उल्लेख केला. एक दृष्टीकोन समोर ठेवून विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही यावेळी ते म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांनी यावेळी जेव्हा काँग्रेस मजबूत असते तेव्हा विरोधकही मजबूत असतात असतात सांगत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी काय केलं जात आहे अशी विचारणा केली.
अकाली दलचे नरेश गुजराल यांनी तर थेट गांधींवरच हल्लाबोल केला. जोपर्यंत गांधी कुटंबाकडे नेतृत्व आहे तोपर्यंत पक्ष मजबूत करणं कठीण असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. सत्ताधारी आणि विरोधकांनी अनेकदा काँग्रेसने नेतृत्वात बदल करण्यासंबंधी भाष्य केलं आहे. दरम्यान काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
राहुल गांधी यांना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, नेतृत्व कोणी करावं हा निर्णय कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे. पक्ष जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल.