धनदांडग्यांकडून डोंगराच्या टोकावरच दगड मातीचा भराव
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
सुरई येथील दत्त टेकडीच्या परिसरात वेगवेगळ्या धनदांडग्यांनी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही धनदांडग्यांकडून डोंगराच्या कडेला होत असलेला दगड मातीचा भराव जीवघेणा ठरत आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेकडो घरांसह आणि हजारो नागरिकांवर मानवनिर्मीत दरडीच्या टांगत्या तलवारीचे संकट ओढावण्याची भीती निर्माण होत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये दरडग्रस्त गावे, वाड्यांची संख्या 181 असून, दरड कोसळून दुर्घटना होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. दरडीत सापडून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत सुमारे 325 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आजपर्यंत पावसाळ्यात नैसर्गिक दरडीचा धोका निर्माण झाल्याने जीवित व वित्तहानी झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील सुरई येथे मानवनिर्मीत दरडीचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या डोंगरावर धनदांडग्यांनी जमीन विकत घेऊन बांधकाम केले आहे. त्यासाठी अवैधरित्या डोंगर पोखरण्यात आले आहेत. दरम्यान, डोंगरातील दगड मातीचा भराव डोंगराच्या टोकावर टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात दगड, माती खाली येऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डोंगराच्या टोकापासून शंभर फूट खाली आदिवासीवाड्यांसह गावे आहेत. या ठिकाणी अडीचशेहून अधिक घरे असून, एक हजारहून नागरिक राहात आहेत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली धनदांडग्यांकडून होणार्या दरडीचा धोका रोखण्यास जिल्हाधिकारी लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरई येथील दत्त टेकडीच्या परिसरात डोंगराच्या किनार्यावर असलेल्या दगड मातीच्या भरावाची पाहणी केली जाणार आहे. या माती, दगडातून दरड कोसळण्याची भीती असल्यास त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल.
रोहन शिंदे,
तहसीलदार,
मुरुड







