गड किल्ल्यातून जपला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

| चिरनेर | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनी किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवाळी हा सण आनंदाचा आणि मुलांच्या आवडीचा सण आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्यानंतरच बच्चे कंपनीला वेध लागतात ते किल्ले बनविण्याच्या कामाचे. अशातच मुलांना प्रोत्साहन देण्याकरता किल्ले बांधण्याच्या स्पर्धा देखील उरण तालुक्यातील काही सामाजिक मंडळामार्फत घेण्यात येत आहेत.

पालकही बच्चे कंपनीला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. चिरनेर येथील जिज्ञेश प्रफुल्ल घरत, साहिल अंकुश घरत, आयुष गणेश घरत ,नितेश रंजित पाटील या बच्चे कंपनीने सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती अगदी उत्तम साकारली आहे. यातून त्यांचा उत्साह द्विगुणित होताना दिसतो. सध्या तयार किल्ले सर्वत्र पाहायला मिळत असताना, ग्रामीण भागातील मुले डोंगरातील व शेतातील लाल, काळया मातीपासून घराच्या अंगणात किल्ले तयार करताना पहावयास मिळत आहेत. किल्ला तयार झाल्यावर त्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केली जाते. त्याचबरोबर पहारेकरी मावळे किल्ल्यावर ठेवले जातात.

मावळे, सैनिक व विविध रंगांनी किल्ला सजवला जातो. त्यावर मोहरी टाकून उगवलेली हिरवळ दाखविली जाते. तसेच पाण्याचे कारंजे व रात्री किल्ल्यावर केलेल्या रोषणाईने किल्ले उजळून निघतात. दिवाळीमध्ये बच्चे कंपनी आणि युवक-युवती देखील निरनिराळे किल्ले, गड, सामाजिक देखावे साकारून कला आणि पारंपारिक संस्कृती जपताना दिसून येत आहेत. रायगड किल्ला, प्रतापगड, सिंधुदुर्ग, कर्नाळा अशा प्रसिद्ध किल्ल्यांंची प्रतिकृती चिरनेर परिसरातील गावागावात तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version