| चिरनेर | वार्ताहर |
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याच्या हेतूने ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बच्चे कंपनीने किल्ले बनवून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे.
चिरनेर उरण येथील कस्तुरी म्हात्रे, स्वरा म्हात्रे, पूर्वा म्हात्रे, सार्थक म्हात्रे, काव्य म्हात्रे, ऋषी भगत, तन्मय वशेणीकर, विघ्नेश वशेणीकर तसेच अन्य मुले एकत्र येत, त्यांनी शेतातील काळ्या मातीपासून किल्ला तयार केला आहे. सोशल मीडियाच्या युगात वावरणारी ग्रामीण भागातील बच्चे कंपनी आजही किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतविताना दिसत आहेत.
दिवाळी हा सण आनंदाचा आणि बच्चे कंपनीच्या आवडीचा सण आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी म्हणजे शाळेच्या सहामाही परीक्षा संपल्या संपल्याच बच्चे कंपनीला वेध लागतात ते किल्ले बनविण्याच्या कामाचे. अशातच मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता किल्ले बांधण्याच्या स्पर्धादेखील उरण तालुक्यातील सामाजिक मंडळांमार्फत आयोजित करण्यात येतात. यातून त्यांचा उत्साह द्विगुणीत होताना दिसतो.
सध्या रेडीमेड किल्ले सर्वत्र पाहायला मिळत असताना, ग्रामीण भागातील मुले डोंगरातील व शेतातील लाल काळया माती पासून किल्ले तयार करताना पाहावयास मिळत आहेत. किल्ल्याला मावळे, सैनिक व रंग यांनी सजविले जाते. त्यावर मोहरी टाकून उगवलेली हिरवळ दाखविण्यात येते. किल्ला तयार झाल्यावर त्यावर शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केली जाते. त्याचबरोबर पहारेकरी मावळे किल्ल्यावर ठेवले जातात. तसेच पाण्याचे कारंजे व रात्री किल्ल्यावर रोषणाई केल्याने किल्ला उजळून निघतो, त्यामुळे किल्ल्याची शोभा वाढते. असे उपक्रम ग्रामीण भागातील अनेक मुले राबवीत असल्याचे चित्र सध्या येथे पहावयास मिळत आहे.