शिक्षणमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; शेकापची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्यातील विविध भागांत शेतकरी कामगार पक्ष, सामाजिक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मंगळवारी (दि.22) अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण-तरुणी तसेच विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शेकापने जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तसेच सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आणि युवकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी अलिबागमधील चेंढरे येथील पीएनपी नाट्यगृह मैदानावर निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल शांताराम पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेतकरी संघटना तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, नगरसेवक अनिल चोपडा, ॲड. परेश देशमुख, ॲड. किशोर हजारे, माजी नगरसेविका संजना कीर, निलेश खोत, संदीप गायकवाड, सुरेश खोत, नागेश कुलकर्णी, दीपक पाटील, काँग्रेसचे आकाश राणे, पुरोगामी संघटनांचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष वेदांत कंटक, सोनाली मोरे, नागेश्वरी हेमाडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान शेकापचे जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. उपस्थितांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण, संविधानावरील निष्ठा आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
