तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
| मुंबई | प्रतिनिधी |
एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळाले असले, तरी वाढीव वेतनाचा फरक हप्ता न मिळाल्याने राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतरही हप्ता न दिल्याचा आरोप करत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने तीन दिवसांत रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा सुमारे 475 कोटी रुपयांची आवश्यकता असते. त्यासोबतच वाढीव वेतनाच्या फरकासाठी 58 कोटी 30 लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम लागते. 13 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढीचा फरक दरमहा सुमारे 65 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सरकारकडून ही रक्कम प्राप्त झालेली नाही.
महामंडळाने 20 जानेवारी रोजी राज्य सरकारकडे तीन महिन्यांच्या एकूण 116.69 कोटी रुपयांच्या निधीबाबत पत्र पाठवले होते. मात्र, निधी न मिळाल्याने व्यवस्थापनाने वाढीव वेतनाचा फरक या महिन्यात न देण्याचा निर्णय घेतला. परिणामी कर्मचाऱ्यांना फरकाविना वेतन देण्यात आले. एसटीवर सध्या 4200 कोटी रुपयांची वैधानिक देणी प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही कर्मचाऱ्यांची अवहेलना असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येत्या तीन दिवसांत सरकारने निधी न दिल्यास रीतसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नामुळे आगामी काळात वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.







