उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

गाळ काढला तर उमटे धरण फुटेल?

‌| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्याची तहान भागविणाऱ्या उमटे धरणातील गाळाच्या प्रश्नावर आता नागरिक आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शुद्ध पाणीपुरवठा करण्यात रायगड जिल्हा परिषद अपयशी ठरल्याची टीका ग्रामीण भागातून होत असताना, “गाळ काढला तर धरण फुटेल” अशी भीती पसरवणाऱ्यांना उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सध्या उमटे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून, धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातून शेवाळ, माती आणि गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या धरणावर अवलंबून असलेल्या सुमारे 60 हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ आणि विषमज्वरासारख्या जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीत 1978-79 या कालावधीत उमटे धरण उभारण्यात आले होते. तब्बल 45 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आक्षी, नागाव, रेवदंडा आणि चौलसह 45 गावांना पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्याला दुर्गंधी येत असून गाळमिश्रित पाणी नागरिकांच्या घरात पोहोचत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद 60 हजारांहून अधिक नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. याप्रकरणी तातडीने उपाययोजना करून धरणातील गाळ काढण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

उमटे धरणातील गढूळ पाणी, साचलेला गाळ आणि नागरिकांना होणारा दूषित पाणीपुरवठा हा प्रश्न विधानसभेतही गाजला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडचे ॲड. राकेश पाटील यांनी, मागील दहा वर्षांपासून गाळ काढण्याच्या मागणीवर प्रशासन आणि काही राजकीय नेते जनतेमध्ये दिशाभूल करणारी ‌‘पुडी’ सोडत होते, असा आरोप केला आहे. “गाळ काढला तर पाण्याच्या दाबामुळे धरण फुटेल,” अशी भीती मुद्दाम पसरवण्यात आली. मात्र, दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता मोहन सरोदे यांनी उमटे धरणाला भेट दिल्यानंतर या अफवांना पूर्णविराम मिळाल्याचा दावा संघर्ष समितीच्या ॲड. राकेश पाटील यांनी केला आहे. धरण फुटण्याचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष अधिक तीव्र झाला आहे. यापूर्वी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकारातून धरणातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी इतरही काही राजकीय नेत्यांनी या कामासाठी सहकार्य केले होते.

सरकारकडे उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी पैसा नसतो, मात्र धरणाच्या सुशोभिकरणासाठी आणि दगडी बांधकामांसाठी कोट्यवधींचा निधी सहज उपलब्ध होतो, ही मोठी शोकांतिका आहे. नवीन धरणे उभारण्याची भाषा करणाऱ्या सरकारने आधी गाळाने भरलेल्या धरणांना गाळमुक्त करून पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान, उमटे धरणातील पाण्याबाबत सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुयोग निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

आठ कोटींची निविदा, पण ठेकेदारच मिळेना!
उमटे धरणाच्या बाबतीत शासनाची भूमिका दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत ॲड. राकेश पाटील यांनी सांगितले की, धरणातील तुटलेली जॅकवेल आणि गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, माणगाव विभागाने 15 एप्रिल 2025 रोजी तब्बल 8 कोटी 81 लाख 35 हजार 631 रुपयांची निविदा काढली होती. मात्र, या कामासाठी सरकारला ठेकेदारच मिळाला नसल्याने उमटे धरण आजही गाळातच रुतलेले आहे.
गंमत नको, हिंमत दाखवा!
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असताना उमटे धरणातील गाळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विजयी उमेदवारांच्या हातातील “मोठं मोठं गार केले गंमत म्हणून, आता उमटे धरणाचा गाळही काढा समाजाचं हित म्हणून” या फलकांची समाजमाध्यमांवर खिल्ली उडवली जात आहे. आतापर्यंत झाली तेवढी गंमत पुरे झाली, आता गाळ काढण्यासाठी हिंमत दाखवा, असा टोला राकेश पाटील यांनी विजयाचे बॅनर दाखवणाऱ्या जि.प. सदस्यांना लगावला आहे.

उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न सोडवण्यात रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हा महसूल विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. नागरिकांना आठ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असेल, तर ही सरकारने लादलेली आधुनिक गुलामीच आहे. प्रशासनाने आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ आणू नये.

ॲड. राकेश पाटील,
उमटे संघर्ष समिती
Exit mobile version