हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न सोडवावाः खा.राऊत

ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल आणि कुणावरही अन्याय करायचा नसेल, तर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करत आरक्षणाचा कोटा वाढवावा. यासाठी हिवाळी अधिवेशनात विशेष प्रस्ताव आणून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. अशात ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत बोलत होते. राज्यातील सध्याची चिंताजनक परिस्थितीबाबत आम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली. महाराष्ट्राने अनेक संकट झेलली आहेत. पण अशी परिस्थिती महाराष्ट्राने कधीच पाहीली नव्हती. याबाबतची सर्व माहिती राष्ट्रपतींना सांगितली आहे.

सरकारमधील मंत्री जाहीर सभेतून एकमेकांना आव्हान देत आहेत. राज्यात शांतता राहावी, महाराष्ट्र दुभंगला जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल, तर संसदेत त्यावर चर्चा करावी लागेल. घटना दुरुस्ती करावी लागेल. कायद्याच्या चौकटीत आरक्षण दिले नाही, तर टिकत नाही हे हरियाणातील प्रकरणावरून दिसून आले आहे. येत्या अधिवेशनात सर्वसमावेशक आरक्षण द्यावे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रात आणायचे काम राज्य सरकारने करावे, असेही राऊत म्हणाले.

राज्य सरकार घटनाबाह्य असले, तरी त्यांनी घटना दुरुस्ती करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विषय माहीत नाही का. कारण ते राज्यात आले तेव्हा मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले होते. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नी लक्ष घालावे. आरक्षणाची मर्यादा वाढवावी, असे राऊत यांनी सांगितले.

Exit mobile version