नाका कामगारांचे जीवन असुरक्षित

मुलांच्या नशिबीही बिगारीचे काम, इतर सुविधा मिळणे गरजेचे

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात नव्याने उभी राहणारी गृहसंकुले, औद्योगिक वसाहत, महाविद्यालये आदी कामांकरिता ठेकेदारांकडे बिगारी कामे निघत आहेत. या कामांकरिता नाका कामगार मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यांना रोजंदारीचे चांगले आमिषही दाखविले जात आहे, मात्र त्यांच्या हक्काचे पैसे देण्याची वेळ येते त्यावेळी त्यांना भांडल्याशिवाय ते पैसे मिळत नसल्याचे वास्तव आहे. बिगारीचे काम करताना बहुमजली इमारतींच्या कामावर जीव धोक्यात घालून लक्ष द्यावे लागते. या नाका कामगारांचे जीवन असुरक्षित असून या कामगारांना शासनाच्या किमान वेतन व इतर सुविधा मिळणे गरजेचे आहे. कामाची हमी नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न देखील भेडसावत असल्याने मुलांच्या नशिबीसुध्दा बिगारी काम असल्याची स्थिती निर्माण झाल्याचे नाका कामगारांचे म्हणणे आहे.

कष्टाच्या, बिगारी कामासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी भागातील माणसे काम मिळेल या अपेक्षेने सकाळी साडेसात वाजल्यापासून परिसरातील मोहोपाडा मिनीडोअर थांब्याजवळ तसेच वावेघर नाक्यावर उभे असतात. या नाका कामगारांना दिवसाकाठी 600 ते 700 रूपये हजेरी मिळते.

बिगारी 350 ते 400 व महिला बिगारीला 250 अशी मजुरी मिळत असल्याने मोहोपाडा व वावेघर नाका सकाळी फुलून गेलेला असतो. येथील नाका कामगारांच्या हाताला काम मिळत असले तरी दाम मात्र भांडून घ्यावे लागत आहे. यामुळे कामगारांना हक्कासाठी झगडावे लागत आहे.


वेठबिगारी नाका कामगारांच्या पाचवीला पुजला आहे. बांधकाम क्षेत्रात राहून लोकांची घरे उभारणारे हात बेघर असल्याने जमिनीवर झोपड्या उभारुन काही कुटूंबे जीवन जगताना दिसतात. काही ठेकेदार या बिगारीचे काम करणार्‍या कामगारांना वेठबिगारीप्रमाणे राबवून घेतात.

भद्रीनाथ चव्हाण
कामगार
Exit mobile version