| रसायनी | वार्ताहर |
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या पाठिंब्याने राष्ट्रव्यापी संघटनाद्वारे 6 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील आर.एस.एस.च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पनवेल, खालापूर, उरण, पेणसह जिल्ह्यातील विविध संघटना सामील होणार असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चाचे संयोजक मनोज महाले यांनी शनिवार, दि.1 रोजी दुपारी पत्रकार परिषदेत दिली.
हा मोर्चा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून, बहुजन समाज यावेळी रायगड जिल्ह्यातून उपस्थित राहणार असल्याचे मनोज महाले यांनी बोलताना सांगितले. मोर्चा काढण्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, देशाचे संविधान बदलण्याचे षडयंत्र आरएसएस मार्फत चालू आहे. बामसेफ संघटनेचे उत्तर प्रदेश राज्य अधिवेशन रोखण्यात येऊन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. संविधानाने देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारावर हा घाला असल्याची माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक मनोज महाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे मधुकर म्हात्रे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राहूल बागडे आदी उपस्थित होते.