रायगडचा पारा 42 अंश पार

उष्णतेच्या लाटेत जनजीवन विस्कळीत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात सध्या उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, तापमानात सातत्याने चढता आलेख दिसून येत आहे. हवामानातील बदलामुळे कधी दमट, तर कधी कोरडे उष्ण वातावरण निर्माण होत असले तरी गेल्या दोन दिवसांपासून उकाड्याने अक्षरशः कहर केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमान 32 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे.

अलिबाग, मुरूड, उरण, पनवेल आणि कर्जत या तालुक्यांमध्ये तापमान 32 ते 37 अंशांच्या दरम्यान आहे, तर म्हसळा, तळा, पोलादपूर आणि पाली या भागांमध्ये तापमान 36 ते 42 अंशांपर्यंत पोहोचले आहे. शनिवारी (दि.25) काही ठिकाणी पारा 42 अंशांवर गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही झाली.

सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाचा चटका तीव्र जाणवत असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, बांधकाम कामगार, शेतकरी आणि मैदानी काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. रसायनी परिसरातील मोहोपाडा येथे तापमानाने 42 अंशांचा टप्पा ओलांडल्याने दुपारच्या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. कोरोनाच्या काळातील ओस पडलेल्या रस्त्यांची आठवण करून देणारे हे दृश्य पुन्हा अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसू लागला आहे. लूज मोशन, ताप, चक्कर येणे, अंगात उकळणे, खोकला अशा तक्रारी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उष्माघात आणि निर्जलीकरणाचा धोका वाढल्याने आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

हवामान विभागाने 26 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वाढत्या उकाड्यामुळे बाजारात कलिंगड, काकडी, खरबूज, ऊसाचा रस आणि थंड पेयांना मोठी मागणी वाढली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा थंड पदार्थांकडे कल वाढल्याने विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत आहे.

अशी घ्या आरोग्याची काळजी
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तहान लागण्याची वाट न पाहता नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. भरदुपारचे कडक ऊन टाळावे, विशेषतः दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर पडणे शक्यतो टाळावे.
हलके व सैल (सूती व फिकट रंगाचे) कपडे वापरावेत. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी, कॅप, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, ओआरएस यांसारखे द्रवपदार्थ नियमित घ्यावेत.
चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, जास्त घाम येणे किंवा अशक्तपणा जाणवल्यास त्वरित सावलीत जावे आणि वैद्यकीय मदत घ्यावी.
Exit mobile version