| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा परीसराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा येथे ग्रामीण भागातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मोहोपाड्याचे रुपांतर शहरीकरणाकडे झपाट्याने होत आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले बस्तान अशा एक ना अनेक समस्यांमुळे मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील गर्दीमुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.
रसायनी परिसराच्या मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदु असणाऱ्या मोहोपाडा बाजारात आगोटीच्या सामानाच्या खरेदीची लगबग उडाली आहे. आसपासच्या गावातील नागरीकांची दुपारनंतर खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, सुकट, बोबींल, खारोड्या, पापड, लोणच्यासाठी कैऱ्या घेताना खेडोपाड्यातील नागरिक दिसत आहेत. मोहोपाडा आठवडा बाजार तुंडूब भरत असल्याने बाजारहाट करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत असल्याने पाकिटमारांचे फावले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरचीची खरेदी सुरु झाली आहे. वर्षभर पुरेल इतका मसाला घरी करुन ठेवण्याची परंपरा असल्याने गृहीणींनी मोहोपाडा बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचा आर्थिक मेळ साधताना गोंधळ उडत आहे. आगोटीचा घरगुती मसाला वापरात आणून तिखट मसाल्याची चव घेण्याची मजा वेगळीच असल्याचे गृहिणींनी बोलताना सांगितले. पावसाळा सुरु व्हायला एक महिना राहिल्याने चार महिने पुरेल एवढे आगोटीच्या सामानाची साठवण करण्यात येत असते. पावसाळ्यात चार महिने पुरेल असे कडधान्ये, मसाला, पापड व इतर सामन खरेदी करण्यात नागरिक गुंतल्याचे दिसत आहे. परिसरात काही गावात घरगुती मसाला तसेच कडधान्य वाळवत टाकल्याचे चित्र दिसत आहे.
मोहोपाड्यात पार्किंगअभावी वाहनचालकांची गैरसोय
रसायनी परिसराचा केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहपाडा शहरात असलेली वसाहत, नवीन झालेले कॉलेजेस, कार्यालये तसेच कारखानदारी व त्यांच्या वसाहतींमुळे मोहोपाडा शहराची लोकसंख्या वाढत चालली असून परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये वाढ झाली आहे.
बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहरात सायंकाळी नेहमीच ट्रॅफिक जाम होते. आसपासच्या गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी आले की, वाहन कोठे उभे करावे हा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी वाहनचालक मध्येच गाडी उभी करुन खरेदी अथवा इतर कामासाठी बाजारात जातात. अशावेळी एखादे वाहन आले तर त्या थांबलेल्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम होवून नागरिक व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात सुसज्ज वाहनतळ झाल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल तसेच वाहतूक कोंडीही होणार नाही. काहीवेळा तर दुकानासमोरही वाहने लावतात. त्याला या दुचाकीस्वारांना पर्याय नसल्यामुळेच ही वाहने कोठेही लावली जातात. त्यामुळे दुकानात ग्राहकाला जाणेही कठीण होते. वाहनचालक, ग्राहक व नागरिकांना होणारा त्रास शासनाने दूर करण्याच्या दृष्टीने मोहोपाडा शहरात एखाद्या ठिकाणी वाहन पार्किंगस्थळ तयार करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
