| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा शहरात दर रविवारी आठवडा बाजार तुडुंब भरत असून या बाजारात रसायनी व आसपासच्या परिसराच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. मोहोपाड्याचे रुपांतर शहरीकरणाकडे झपाट्याने होत आहे. तर येत्या वर्षांत नगरपरिषद होण्याचे विश्वसनीय संकेत मिळत आहेत. अरूंद रस्ता, वाहतूक कोंडी व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले बस्तान अशा एक ना अनेक समस्यांमुळे मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील गर्दीमुळे चालणे कठीण बनले आहे.
बाजारपेठेतून प्रवास करताना एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत असून रविवारी बाजारपेठ खचाखच भरत असल्याने फळे विक्रेते, कापड विक्रेते, भाजी विक्रेते तळ ठोकून बसलेले असतात. त्यामुळे खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाजारपेठेतून बाहेर पडताना धावपळ करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळते. कापड दुकान, बांगड्या, साहित्य, खाद्यपदार्थ, भांडी व शोभेच्या वस्तू या बाजारात स्वस्त मिळत असल्याने रसायनीकर गर्दी करतात. या बाजारात कापड दुकानांसह अन्य मालाची अनेक दुकाने दिसून येतात. मोहोपाडा आठवडा बाजारातील जागेचे नियोजन केल्यास दुकानदारांना सोयीचे होईल. बाजारातील माल स्वस्त मिळत असल्याने परिसरातील रिस, कांबे, चांभार्ली, आकुळवाडी, रिसवाडी, सावळे, जुनी पोसरी, गुळंसुदे, आपटा, कासप, कैरे, वाशिवली, लोहोप आदी गावातील नागरिक येत असतात.
या बाजारपेठेत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग खरेदीसाठी येत असतो. या बाजारात कपडे व शोभेच्या वस्तू शहरातील अन्य दुकांनापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्याने महिलांसह नागरिक आठवड्याचा माल खरेदी करत असतात. त्यामुळे या बाजाराला तालुक्यातून महत्त्व आले आहे. मोहोपाडा प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्यावरच आठवडा बाजाराची जागा असल्याने या रस्त्यावरून वाहनांची रेलचेल सुरुच असते.