कर्मचाऱ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
| माणगाव | प्रतिनिधी |
शासकीय कर्तव्य बजावत असताना महसूल अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या प्रकाराला विरोध करत रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी सोमवारी, दि. 27 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनाच्या पवित्र्यात उतरले आहेत. पोयनाड पोलीस ठाण्यात दाखल करुन केलेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
या गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविदास सदुसिंग जाधव (चरी) आणि ग्राम महसूल अधिकारी सतीश भानुदास ढवळे (शहापूर) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी रविदास जाधव यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट अटक करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. पोलिसांची ही कारवाई एकतर्फी असून, महसूल कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
महसूल अधिकाऱ्यांचे संबंधित कामकाज हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 अंतर्गत त्यांच्या शासकीय कर्तव्याचा भाग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शासकीय कर्मचाऱ्याकडून कामकाजात चूक अथवा हलगर्जीपणा झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार विभागीय कारवाईची तरतूद असताना थेट फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या कारवाईवर संघटनेने आक्षेप घेतला आहे. तसेच, सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व चौकशी करणे अपेक्षित असताना कोणतीही तांत्रिक अथवा महसुली चौकशी न करता जाधव यांना अटक करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
जाधव यांच्यावरील अटकेच्या कारवाईचा फेरविचार करून त्यांची मुक्तता करावी, त्यांच्यावरील गुन्हा रद्द करावा, सतीश ढवळे यांना अटक करू नये, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पोयनाड पोलीस ठाण्याकडून काढून उपविभागीय पोलीस अधिकारी अथवा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा आणि तपासात वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे तांत्रिक अभिप्राय घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून थेट अटकेची कारवाई केली असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
महसूल कर्मचाऱ्यांवरील अशा प्रकारची फौजदारी कारवाई थांबवून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सोमवार, दि. 27 जुलैपासून रायगड जिल्ह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक तसेच अन्य महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा रायगड महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.







