हवामान विभागाची माहिती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्हं दिसून येऊ लागली आहेत. अंदमानच्या बेटावर दाखल झाला असून, तो वेगाने पुढे सरकतोय, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सून 27 मेपर्यंत केरळ किनार्यावर पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षांतील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागांत पोहोचला आहे, असे हवामन शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, नैऋत्य मोसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. 15 किंवा 16 मेपर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल. पुढील 2 दिवसांत बहुतेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. 14 मेपर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, प. बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे.
मान्सून कधी कोठे पोहोचणार?
15 मे : अंदमान आणि निकोबार. 1 जून : केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय.5 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.6 जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टीव्यतिरिक्त जिल्हे. 10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार. 15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश. 20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली. 25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश. 30 जून : राजस्थान, नवी दिल्ली.
सरासरीपेक्षा जास्त पाऊस
भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज 2015 वगळता गेल्या 20 वर्षांत बरोबर ठरला. यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.
रायगडला यलो अलर्ट
हवामान विभागाने महाराष्ट्रात 11 ते 19 मेदरम्यान वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या कालावधीत राज्यातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.