ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा
| रायगड | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडित असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार आहे. आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत याला मान्यता दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या नावबदलाची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पत्र सादर करण्यात आलं होतं. छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगड वाडी या तीन महसुली गावांची विशेष ग्रामसभा पार पडली. यात एकमतानं नामांतराविषयी निर्णय घेण्यात आला. छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचं नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ करावं अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे. या निर्णयाचं ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय छत्री निजामपूरमध्येच राहावं, अशी आग्रही मागणीही ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे. स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला होता. किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या छत्री निजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव रायगडवाडी करा अशी मागणी करण्यात आली होती. किल्ले रायगड ज्या ग्रामंपचायतीच्या हद्दीत येतो त्याचं नाव छत्री निजामूपर ऐवजी रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केल्यानंतर स्थानिकांनी देखील नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
