सावरकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे

राज्यपाल कोश्यारी यांचे प्रतिपादन
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
देशाला स्वा. सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्ली तर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय इतिहास संशोधन परिषद, नवी दिल्ली तर्फे स्वा. सावरकर यांच्यावरील डिसमँटलिंग कास्टिझम-लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेन्शिअल्स ऑफ हिंदुत्व या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून ती गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न होत आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यासमयी उपस्थितांचे संबोधन करताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, स्वा. सावरकर यांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होणे, ही उल्लेखनीय बाब आहे. सावरकरांनी भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे.
तसेच आपल्या मार्गदर्शनात जातीव्यवस्थेवर बोट ठेवत ते म्हणाले की, गावागावांमध्येभारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. राष्ट्र निर्माणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर गुरू घासीदास विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, मुंबईच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर आयसीएचआरचे सदस्य सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश कदम आदी उपस्थित होते. प्रा. उमेश कदम यांनी परिषदेची संकल्पना, स्वा. सावरकरांचे विचार आणि कार्य समजून घेण्याची आवश्यकता विशद केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, प्रा. हिमांशु चतुर्वेदी, डॉ. नीरज श्याम देव, अक्षय जोग, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे यांच्यासह सावरकरप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version