। मुंबई । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील न्हावे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील न्हावे-गडबल रस्त्यावरील पूल नादुरुस्त झाला असल्यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी शेकापक्षाचे ज्येष्ठ आ.जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
सदर पूल कोसळल्यास न्हावे, नवखार व सोनखार या गावातील ग्रामस्थांना जाण्या-येण्याचा मार्ग बंद होणार असल्याने पर्यायी नसल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीचे होणार आहे. सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुलाची दुरुस्ती अथवा नवा पूल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी रोहा व महाड सार्वजनिक बांधकाम विभागाला ही निवेदन देण्यात आले आहे. तरी अद्याप त्या पुलावर पाहिजे तशी दुरुस्तीची कार्यवाही होत नाही अशी प्रश्नांची सरबत्तीच आ.जयंत पाटील यांनी केली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावर लेखी उत्तर देताना म्हणाले की, सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले असून सदर पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सदर पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार पुलाचे काम हाती घेण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न आहे.