पालकमंत्र्यांनी रिलायन्सला ठणकावले

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास कारवाईचा इशारा

| कर्जत/नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाईप लाईनने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन मोबदला देण्याची आग्रही मागणी केली. या बैठकीत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय समंत यांनी चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांची, मराठी माणसाची फसवणूक झाल्यास कोणाचीही गय करण्यात येणार नाही, असे ठणकावले.

कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करत असून अनेक आंदोलने, उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री उदय सांमत यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी रिलायन्स आणि शेतकरी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने शेतक-यांची फसवणूक केलेली आहे याबाबत माहिती दिली व याविषयी तातडीने न्याय मिळावा यासाठी विनंती केली. सदर बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, कर्जतचे तहसिलदार, रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचे सक्षम अधिकारी अनिल सावंत, रिलायन्स अधिकारी हितेन रॉय, कुमारवेल यांच्यासह कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे नेत्तृत्व करणारे केशव तरे, राजेश भगत, दिपक बेहरे, किरण ठाकरे तसेच शेतकरी रमेश कालेकर, सुरेश खाडे, रघुनाथ तरे, गणेश तरे, उमेश राणे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत या प्रकल्पात कशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली याबाबत शेतक-यांनी यादीच पालकमंत्री यांच्यासमोर मांडली आणि तातडीने याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिका-यांनी तातडीने बैठक लावून याबाबत सविस्तर माहिती सादर करून कंपनीने कशा प्रकारे जमिन अधिग्रहित केली आहे याबाबत अहवाल मागविला आहे. तसेच कंपनी प्रशासनाची कोणतीही हयगय न करता आमची बांधिलकी शेतकऱ्यांशी अजून त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असल्याने जर याविषयी कंपनी शेतकऱ्यांना न्याय देणार नसेल तर शासकीय नियमावलीनुसार त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. सदर, प्रकल्पाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Exit mobile version