बोटींची संख्या कमी असल्याने त्रस्त; सावलीसाठी निवारा शेडची गरज
| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड-जंजिरा येथील खोरा बंदर परिसर कोकणातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. एकदरा डोंगरापलीकडे समुद्राच्या कुशीत वसलेला प्रसिद्ध जंजिरा किल्ला, उजव्याबाजूस शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला, अगदी समोर दिघी प्रकल्प व डोंगरी गावच्या काळ्या दगडाच्या डोंगराखाली सुंदर पांढऱ्या वाळूत वसलेले खोरा बंदर पर्यटकांना अनेकवर्षांपासून आकर्षित करत असतो. परंतु, या परिसरात खऱ्याअर्थाने विकास झालेलाच नाही. येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच किल्ल्यात जाण्यासाठी बोटी देखील कमी पडत असल्याने पर्यटकांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे याठिकाणी येणारा पर्यटक त्रस्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. येथे येणारा पर्यटक आवर्जून मुरूड-जंजिरा किल्ल्याला भेट देतोच. या जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी राजपुरी व खोरा बंदरातील जेट्टीवरून सात लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. पर्यटकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रवासी वर्गामागे ठराविक लेवी कर आकारला जाऊन त्याचे उत्पन्न महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डास मिळत असते. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना किल्ल्यापर्यंत पोहचवले जाते. या दोन्ही बंदरात सुट्टीच्या हंगामात तुफान गर्दी होत असते. खोरा बंदरातील नवीन जेट्टी प्रवाश्यांच्या सेवेवसाठी हे पहिले पाऊल आहे. त्यामुळे खोरा बंदरातील नवीन जेट्टी हि वरदायी ठरणार आहे. लांबी व रुंदी जास्त असल्याने या जेट्टीवर शेकडो पर्यटक अगदी सहज चढू व उतरू शकणार आहेत. ओहटीच्या वेळी नवीन जेट्टी खूपच आवश्यक ठरणार असून पर्यटकांचा खोळंबा होणार नाही. सध्या खोरा बंदरातील नवीन जेट्टीचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून असंख्य प्रवासी व पर्यटकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या जेट्टीवरून ओहटीच्या वेळी प्रवासी वाहतूक करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे या कामाला तातडीने निधी मंजूर करण्यात आला होता. सध्या बांधण्यात येणारी नवीन जेट्टी हि नव्या स्वरूपात बांधण्यात येणार असून सुमारे 150 मीटर पाण्याच्या आत नवीन जेट्टीचे काम केले जाणार आहेे. जुनी जेट्टीची लांबी कमी असल्याने ओहटीच्या वेळी प्रवासी होड्या अडकून पडत असत. हि अडचण लक्षात घेऊन नवीन जेट्टी बांधण्यासाठी तिची लांबी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ओहटीच्या वेळी प्रवास करताना कोणताही त्रास प्रवासी वर्गाला होणार नाही. खोरा बंदरातून जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना सहज जाता यावे यासाठी हि जेट्टी खूपच उपयुक्त ठरणार आहे.
असे असलेतरी सध्यपरिस्थितीत या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी मुरूड तालुक्यात पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात राज्यभरातील शाळेच्या सहली देखील याठिकाणी येत आहेत. खोरा बंदर व राजपुरी जेट्टी या ठिकाणाहून जंजिरा किल्ल्यात बोटीद्वारे जाता येते. परंतु, पर्यटकांची संख्या वाढल्याने बोटींची संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तासन्तास बोटीचा वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यातच, या ठिकाणी पर्यटकांना बोटीची वाट पाहत उभं राहण्यासाठी कोणतीही निवारा शेड नाही. त्यामुळे पर्यटकांना उन्हातच उभे राहावे लागते. त्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचे सुर उमटत आहेत. त्यांच्याकडून याठिकाणी असलेल्या पार्कींगमध्ये सावलीसाठी शेड उभारण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
पर्यटन वाढीसाठी विकासकामांची गरज
मुरूड येथील कपारीत वसलेल्या काळकाई आईच्या मंदिराखाली किनारा पर्यटकांना बोटींसाठी अतिशय सुंदर आहे. तसेच, येथील समुद्राचे पाणी देखील निळेशार व नितळ आहे. त्यामुळे येथील समुद्र स्कुबा डायविंगसाठी योग्य आहे. खोरा बंदर ते राजपुरी समुद्रालगत दगडावरून रस्ता काढला तर जगातील सुंदर सनसेट पॉईंट होऊ शकतो. कारण मुरूड-जंजिरा व पद्मदुर्ग या दोन जलदुर्गामधून सूर्यास्त होत असताना त्याचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात दिसते. हे मनमोहक सुंदर रूप फक्त याच किनाऱ्यावर पाहायला मिळते. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडून अशा प्रकारे विकास कामे करण्याची गरज असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.






