एका पेटीला दहा हजारांचा भाव

रायगडातील पहिला हापूस मुंबई दाखल ; शेतकरी वरुण पाटीलने मिळवला मान

| पाली/बेणसे | वार्ताहर |

कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपूर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसऱ्या वर्षी अलिबाग येथील रहिवासी, तर रोहा तालुक्यातील बागायतदार एस.के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी दि. 19 जानेवारी रोजी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चार आणि केशरच्या चार अशा एकूण आठ पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. एका पेटीला दहा हजारांचा भाव मिळाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार, फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून, त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना यामुळे खर्चात वाढ होते. तरीदेखील अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वरूण संजयकुमार पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्ह्यातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे.

कोकणातील हापूस आंब्याला विशिष्ट सुगंध असतो, इतर आंब्यांच्या तुलनेत त्याचा गोडवाही चांगला असतो. हापूस आंबा हा कोकणातील हवामानातच चांगले उत्पन्न देत असतो. हे पीक कोकणातील विविध भागात चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ठाणे या पाचही जिल्ह्यांना हापूसचे जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. वरून पाटील यांनी सांगितले की, कोकणचा आंबा नेहमीच भाव खात असतो. याउलट, कर्नाटक, केरळ आणि परराज्यातून येणारा आंब्याला हापूसची सर नाही. कोकणातील हापूस आंब्याची विशिष्ट चव, गोडी आणि सुगंध जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो.

कृषी अधीक्षकांकडून अभिनंदन
सध्या पहिल्या पेटीचा भाव 10 हजार रुपये इतका असून, पुढील आंबा पीक सरासरीपेक्षा कमी असल्याची शक्यता वरूण पाटील यांनी वर्तवली आहे. हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी वरूण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रायगड कोकणातील हापूस आंबा जगभरातील खवय्यांना भुरळ घालतो. आंबा उत्पादन अधिक झाल्यास कोकणातील शेतकरी सधन व समृद्ध होतो, तर याउलट हवामानातील बदलामुळे उत्पादन घटल्यास वाहतूकदार, विक्रेते, दलाल, मजूरकर सर्वांनाच तोटा सहन करावा लागतो. यंदा हापूसचे चांगले पीक येईल व राज्यासह देश आणि जगभरात पोहचेल अशी अपेक्षा आहे

वरुण पाटील, एसके मँगोजचे मालक
Exit mobile version