देहर्जे नदीवरील पुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

। पालघर । प्रतिनिधी ।

मनोर-वाडा रस्त्यावरील देहर्जे नदीवरील पुलावरून सुरु असलेल्या अवजड वाहतुकीमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील पोलीस बंदोबस्त हटवण्यात आल्यामुळे पन्नास टनापेक्षा अधिक वजनाची वाहने पुलावरून वेग मर्यादेचे उल्लंघन करून दिवसरात्र धावत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे अवजड वाहतूक रोखण्याची मागणी जोर धरत आहे.

देहर्जे नदीवरील पुलाच्या सुरक्षिततेसाठी वाहनांना वेग मर्यादेसह पुलाच्या स्ट्रक्चरवर सेन्सर बसवून नजर ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. तसेच, नादुरुस्त पुलालगतच्या अपूर्णावस्थेतील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. 34 टन क्षमतेपेक्षा अधिक वजन आणि वेग मर्यादा ओलांडून अवजड वाहने पुलावरून जात असताना अवजड वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेसारखी दुर्घटना देहर्जे पुलावर घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काँक्रीटीकरणाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी आणि अन्य कारणामुळे मनोर-वाडा रस्त्यावर वाहनांच्या संख्येत दीड पटीने वाढ झाली आहे. देहर्जे नदीवरील पुलावर वेळोवेळी केलेल्या दुरुस्त्यांमुळे पुलाच्या वजनात वाढ झाली आहे. नुकताच पुलाच्या पृष्ठभागाची दुरूस्ती करण्यात आली आहे. परंतु, पावसाळा सुरु झाल्याने पुलाचे फाउंडेशन आणि सबस्ट्रक्चरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान, व्हीजेटीआयचा अंतरीम अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला नुकताच प्राप्त झाला आहे. अहवालात देहर्जे नदीवरील पुलावरुन 34 टन पेक्षा अधिक वजनाची वाहने 30 किलोमीटर प्रती ताशी वेगापेक्षा अधिक वेगाने वाहतुकीस मनाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

पुलावर सेन्सर लावून हालचालींची माहिती संकलित केली जात आहे. आतापर्यंत काही मर्यादेपेक्षा अधिक वजन आणि वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या वाहनांना रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. अपूर्ण बांधकाम असलेल्या पुलाचे बांधकाम आणि जमीन अधिग्रहण प्रक्रियेसाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.

पोपट चव्हाण,
उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर.

34 टनापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. सावित्री नदीवरील पुलासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे तात्काळ अवजड वाहतुकीवर बंदी घालावी.

रुपेश नरगोळकर,
माहिती अधिकार कार्यकर्ता
Exit mobile version