आ. जयंत पाटील यांनी सरकारला विचारला जाब विचारला
। मुंबई ।वार्ताहर ।
मुरुडसह गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 2009 साली 30 कोटी रुपये खर्च करून आंबोली धरण बांधले. मात्र, आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल सात वर्षांपासून बंद पडल्यामुळे हजारो शेतकर्यांना कालव्याचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे अंदाजे 600 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकली नाही, त्यामुळे शेतकर्यांना दुबार पीक घेता नाही. दोन्ही कालव्यांची कामे अद्याप का रखडली, याबाबत आ. जयंत पाटील यांनी सरकारला जाब विचारला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर उत्तर देताना म्हणाले की, जयंत पाटील यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी असली तरी आंबोली धरणावरील उजव्या व डाव्या तीर कालव्यापासून 44 हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. आंबोली धरणाच्या तीर कालव्याची लांबी 7.10 कि.मी प्रस्तावित असून, त्यापैकी 1.0 कि.मी.मधील कामे पूर्ण झाली आहेत. आता पारंपरिक उघड्या कालव्याऐवजी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक 98.28 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झालेले असून, जाहीर अंतिम निवाड्यानुसार शेतकर्यांना 4.68 कोटी इतकी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. आणि, सदर खातेदारांनी कलम खाली दिवाणी न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार वाढीव नुकसान भरपाईकरिता 63.48 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात आलेले आहेत. निधी उपलब्धतेनुसार पुढील दोन वर्षांत रखडलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.